रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये गावात गावचा नावदर्शक विद्युत बोर्ड अज्ञातांनी तोडला आहे, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर देखील अज्ञातांनी फाडले असल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनेची कसून चौकशी करून सदर आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली असून, तसे निवेदन आज साखरपा पोलिसांना देण्यात आले. यावेळी उप सरपंच आणि उपतालुका प्रमुख शिवसेना (शिंदे गट) संजीव चव्हाण, सरपंच शीतल गार्डी, रुपेश चव्हाण, एकनाथ शिंदे, सौ.किरण चव्हाण- माजी सरपंच, अरुण गोरुले – माजी सरपंच, दीपक पवार, उमेश कारेकर, शिव इरले, सुरेश चव्हाण, राजू कोलपटे, प्रथमेश काबदुळे, स्वप्नील चव्हाण, दीपक माने, पल्लवी चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे गावातील व पुर्ये गावच्या प्रवेशद्वारावर काजळी नदीच्या लगत असलेल्या ‘आपले पुर्ये’ हा विद्युत रोषणाइनें असलेला व गावाची ओळख दाखवणाऱ्या बोर्डाची अज्ञाताकडून मोडतोड करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुर्ये दौऱ्याच्या वेळी स्वागतासाठी लावलेल्या फलकांची देखील मोडतोड करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त साखरपा पोलिसांना समजताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉस्टेबल नितीन जाधव यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन वस्तूस्थितीची पाहणी केली. सध्या पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान ही घटना अतिशय विकृत वृत्तीची असून गावातील शांतता भंग पडावी या उद्देशाने करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी करून सदर आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे, तसेच याबाबत निवेदन आज साखरपा पोलिसांना देण्यात आलं. या निवेदनात म्हणण्यात आलं आहे की, ‘आमच्या पुर्ये तर्फे देवळे गावातील प्रवेशद्वाराजवळ (पुलाजवळ) गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावचा नावदर्शक फलक (एक्रेलिक) बनवला होता. गावच्या शोभेत वाढ व्हावी या उद्देशाने तरुणांनी पैसे काढून सदर फलक दिनांक १८ सप्टेंबर रोजी गावच्या प्रवेशद्वाराजवळ बसवला होता. हाच नावदर्शक फलक ९ ऑक्टोंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या दरम्यान तोडण्यात आला आहे. सदर घटना ही अतिशय विकृत वृत्तीची असून गावातील शांतता भंग पडावी या उद्देशाने केली आहे. त्यामुळे या घटनेची कसून चौकशी करून सदर आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.