महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
चिपळूण : विकसित भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कष्ट घेत आहेत. म्हणून त्यांनी अभिमानाने सांगितलेल्या ‘अब की बार चारसौ पार’ मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जनतेने तुमच्या हक्काचा खासदार म्हणून मला निवडून द्या. आपल्या अपेक्षा तीन वर्षात पूर्ण करेन, असा शब्द लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी चिपळूणवासीयांना दिला.
ते पुढे म्हणाले, माझी कामाची पध्दत काहीशी वेगळी आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न मी शिल्लक ठेवत नाही. सिंधुदुर्गातील जनतेला याची कल्पना आहे. तेथे रोजगार, पर्यटनाला चालना दिली. अनेक प्रकल्प आणले, येणाऱया पुढील काळातही अनेक उद्योग सिंधुदुर्गात आणण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. सिंधुदुर्गातील पाणी प्रश्न निकालात काढला आहे. तेथे झालेल्या विकासामुळे सिंधुदुर्गची ख्याती सर्वदूर पसरली आहे. प्रत्येक गावाला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवल्या आहेत. अशा पध्दतीचे काम पुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यातही मला करायचे आहे. येथील अनेक प्रश्न रखडले आहेत. तेही मला पूर्ण करायचे आहेत.
एकीकडे पीएचडी झालेल्या माझ्या मुलाला पराभूत करून ज्या अकरावी नापास झालेल्या विनायक राऊतला तुम्ही निवडून दिलीत त्याने काय विकास केला. कोकणात कुठे काही करायचे म्हटलं की प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याशिवाय त्यानी कोणता काम केलेले नाही. सिंधुदूर्गतील विमानतळालाही विरोध केला. मात्र आपण विकासाच्यादृष्टीने हे विमानतळही पुर्णत्वास नेले. आणि विरोध करणारा हा खासदार त्याच्या उद्घाटनाला मात्र सर्वांचे स्वागत करत होता. आपण प्रत्येकी गरज भागवली. माणसं जोपासली. आयुष्यात कुणाच्याही वाटयाला आली नसतील एवढी पदे मिळाली. पण आपण कधी नेतेपण मिरवलेलं नाही. आजला माणुसकी या गुणावर लोकं माझ्यावर प्रेम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार शेखर निकम यांनी जिल्हयाच्या विकासासाठी राणे यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगीतले. ज्याप्रमाणे सिंधुदूर्गाचा विकास झाला त्यापध्दतीने येथील विकासासाठी ते तळमळीने काम करतील. चिपळूणचा पुर आणि नदी संवर्धनाचा प्रश्न हा महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगलीला केंद्राकडून मोठा निधी मिळाला तसा निधी चिपळूणला मिळण्यासाठी राणे यांच्याकडून चिपळूणवासीयांच्या अपेक्षा आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार असल्याने आमची भूमीका महत्त्वाची आहे. आजला भाजपा, मनसे, शिवसेना ज्या पध्दतीने मतदारसंघात काम करत आहे ते पहाता मतदानापर्यत सर्वानी झटून काम करत राहीले तर मतदारसंघातून सवाधिक मताधिक्य हे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातून मिळण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगीतले.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही आपल्या मार्गदर्शनात केंद्रीय मंत्री राणे आणि त्यांच्या माध्यमातून झालेला कोकणचा विकास याचा उल्लेख करत या निवडणूकीत या मतदारसंघात महायुतीचे सर्व घटकपक्ष जोमाने काम करून मोठं मताधिक्य देण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगीतले.
मनसो सरचिटणीस वैभव खेडेकर यांनीही या मतदारसंघात मनसे कार्यकर्ते जीवाचे रान करून राणे यांना मताधिक्य देण्यात आघाडीवर असेल असे सांगीतले. तर आरपीआयचे नेते दादा मर्चंडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय या मतदारसंघात अधिक जोमाने काम करत आहे. मात्र निवडणूकीनंतर आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, संगतीला हवे आणि पंक्तीला नको अशी परिस्थिती आणू देऊ नका असे सांगीतले.
यावेळी भाजपो माजी आमदार मधू चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालूकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके, शिवसेना तालूकाप्रमुख संदेश आयरे, युवासेना तालूकाप्रमुख निहार कोवळे, भाजपा सराचिटणीस रामदास राणे, माजी सभापती शशिकांत चाळके, मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष नलावडे, शहराध्यक्ष अभिनव भूरण, राष्ठ्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, दादा साळवी, मिलिंद कापडी, आदीती देशपांडे आदी उपस्थित होते.