मंत्री रवींद्र चव्हाण यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
रत्नागिरी : महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या बैठकांमधून समन्वय समितीच्या माध्यमातून बैठका होत असून त्याला मोठे यश येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यात पुढाकार घेतला असून, किरण सामंत यांना सोबत घेऊन राजापूरमध्ये घेतलेली महायुती कार्यकर्ता समन्वय समिती बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वत: भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व महायुतीमधील अन्य मित्र पक्षांशी संवाद साधत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात यशस्वीपणे समन्वय घडवून आणला आहे. चिपळूण, रत्नागिरी पाठोपाठ राजापूर विधानसभा मतदार संघातही त्यांनी समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. यात मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांना सोबत घेत शिवसैनिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न त्यांनी तीनही मतदार संघात सुरु केला आहे. राजापूर येथील बैठकीत किरणभैय्या सामंत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उल्का विश्वासराव यांच्यासह मनसे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील कार्यक़र्त्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगत सुनियोजित व समन्वय साधून प्रचार करा असे आवाहन केले.