रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित भाई शहा यांची तोफ धडाडणार आहे. अमित शहा सभेनिमित्त प्रथमच येत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर 25 ते 30 हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (3 मे) विराट सभा होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली
नारायणराव राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली. आता अमित भाई शहा येणार आहेत. तीन मे रोजी दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. पूर्ण मैदानावर मंडप आहे, या ठिकाणी सुमारे 25 ते 30 हजार लोक एका वेळेला बसू शकतात. या सभे करता नियोजन करण्यात आले आहे. सभेला येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
महायुतीसाठी पोषक वातावरण असून नारायण राणे विजय घोडदौड चालू ठेवतील. अमितभाइंची सभा ऐतिहासिक सभा होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला तुफान गर्दी होणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
यापूर्वी अमित भाई शहा यांची सभा 24 एप्रिल रोजी होणार होती मात्र हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता आता ही सभा तीन मे रोजी होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून केंद्रीय गृहमंत्री रत्नागिरी देण्यात असल्यामुळे त्यांच्या जंगी स्वागत ची तयारी करण्यात येत आहे.
नारायणराव राणे यांच्या प्रचाराच्या सभा सर्व ठिकाणी होत असून प्रत्येक बुथवर कार्यकर्ता सक्रिय झाला आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत, लोकसभा सह प्रभारी तथा माजी आमदार बाळासाहेब माने, बाबा परुळेकर, डॉ हृषीकेश केळकर, अतुल काळसेकर, सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अधटराव यांच्यासमवेत, सर्व विधान सभाप्रमुख सर्व पदाधिकारी सक्रिय नियोजन करत आहेत.