नवी दिल्ली : भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील सहा स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सन्मान केला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र चळवळीत योगदान देणा-या देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यातील मुंबई उपनगरचे जेठालाल अमृतलाल शाह, जळगावचे शिवाजी विठ्ठल मराठे, नागपूरचे पुंडलिक दौलतराव गेडाम, सोलापूरचे रघुनाथ रामचंद्र माने, यवतमाळचे प्रल्हाद कृष्णराव रेम्बे, चंद्रपूरचे श्रीराम पाडुरंग पाटील यांचा समावेश आहे. पुण्याचे स्वातंत्र्य सैनिक बलवंत मोरेश्वर पुरंदरे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमात उपस्थित होऊ शकले नाहीत
स्वातंत्र्य सैनिक जेठालाल अमृतलाल शाह सध्या मुंबई उपनगरात राहतात, ते माहिती खात्याचे माजी उपसंचालकही आहेत. शाह यांनी भारत छोडोच्या आंदोलनात सक्रिय भाग नोंदविला आहे. महात्मा गांधीजींनी जेव्हा भारत छोडो आंदोलनाचा हुकांर दिला, त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यात लोकांना जागृत करण्यासाठी बैठका बोलवणे, मिरवणूक, मोर्चे काढण्याचे नेतृत्व शाह यांनी निभावले. दोनदा इंग्रजांनी त्यांना पकडलेही होते. स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासात अहमदनगर जिल्ह्यांच्या सरोश टॉकीज बॉम्ब केसची नोंद आहे. त्यात शाह यांचा सहभाग होता. भूमिगत राहून स्वातंत्र्य चळचळीत महत्वपूर्ण भूमिका निभावणारे अच्युत पटर्वधन यांनी त्यावेळी शाहांना त्यांच्या घरी तीन आठवडे आश्रय दिला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांचा प्रश्न मोठा होता, त्यावेळी अहमनगर जिल्ह्यातील विसापूरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या निर्वासिंताना आवश्यक घरगुती सामान वितरीत करण्याचे करण्याचे काम ही शाह यांनी केले आहे. १९५५ मध्ये जेव्हा गोवा मुक्ती संग्रामचा लढा सुरू झाला त्यातही शाह यांनी सक्रिय भुमिका निभावली.
स्वांतत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे हे जळगाव चे आहेत. गोवा मुक्ती संग्राममध्ये मराठे यांनी सहभाग नोंदविला आहे. दिवंगत स्वातंत्र्य सैनिक देवराम रामजी पाटील यांच्या नेतृत्वात ३० सत्याग्रही पुण्याकडे निघाले होते, त्यात मराठे यांचा समावेश होता. मराठे यांनी दिवंगत स्वातंत्र्य सैनिक जयवंतराव टिळक यांना आपण आपल्या पत्नीसह गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होत असल्याचे लेखी दिले होते.
स्वातंत्र्य सैनिक आणि दिवंगत माजी अर्थ मंत्री मधु दंडवते, मराठे यांच्यासह ३० सत्याग्रही बेलगाव, सांवतवाडी, अर्नोडा वरून १७ ऑगस्ट १९५५ ला गोव्यात दाखल झाले, पोर्तुगीजांनी त्यांच्यावर लाठी चार्ज केला होता. मराठे यांच्या पायांना, खांद्यावर, पाठीवर जख्मा झाल्या,अशा प्रकारे मराठे यांचे गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग होते.
स्वातंत्र्य सैनिक पुंडलिक दौलतराव गेडाम हे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील थातुरवाडा येथील आहेत त्यांचा जन्म १० मार्च १९२४ चा आहे. जेव्हा गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा इशारा दिला, त्यावेळी गेडाम हे पाचव्या वर्गात होते. मात्र, सर्वत्र स्वातंत्र्य लढयाचे वातावरण होते,अशा वातावरणात आपली भुमिकाही सक्रीय असावी असे ठरवून त्यांनी या आंदोलनात उडी घेतली. त्यांचे काही वरिष्ठ आंदोलक तुरूंगात कैद होते त्यामुळे त्यांनी भूमिगत राहून काम पाहिले. इंग्रजांच्या काळात होणा-या परिक्षांवर बहिष्कार घातला, भूमीगत असणा-या वरीष्ठ आंदोलकांना संदेश पोहोचविणे, स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत पोस्टर्स लावणे, अशा विविध भुमिका स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात त्यांनी निभावल्या आहेत.
स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ रामचंद्र माने हे क्रांतीसदन गुरूनगर अकलूज माळशिरस, जिल्हा सोलापूरचे आहेत. माने सध्या १०१ वर्षाचे आहेत. १९४२ च्या स्वातंत्र्य समरमध्ये त्यांना नऊ माहिनांचा कारावास सोसावा लागला. हा कारावास त्यांनी सोलापूर, विजापूर आणि विसापूर येथे काढला. इंग्रजांनी त्यांना कारावासासह १०० रूपयांचा दंडही केला, हे पैसे वसूल करण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्या घरातील सामानांची निलामी करून हे पैसे वसूल केले होते.
त्यांच्या स्वातंत्र्य लढयाची नोंद इतिहासाने घेतली आहे. १५ ऑगस्ट १९७२ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ताम्रपट देऊन त्यांचा सन्मान केला. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही सन्मानपत्र देऊन गौरव केला. आजही ते जनतेत स्वातंत्र्य आंदोलनाची गाथा ऐकवतात.
स्वातंत्र्य सैनिक श्रीराम पाटील, चंद्रपूरचे यांचा जन्म १९२८ चा आहे. वयाच्या १४ व्या वर्षी महात्मा गांधीच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नंतर दहावीची परीक्षा मध्येच सोडून त्यांनी सैन्यामध्ये भरती होने पसंत केले आणि देशसेवेला प्रथम प्राधान्य दिले.
स्वातंत्र्य सैनिक प्रल्हाद कृष्णराव रेंभे हे यवतमाळ हे आहेत. नऊ ऑगस्ट १९५५ ला सहा स्वातंत्र्य सैनिकांसह १०ऑगस्ट १९५५ ला पुण्याच्या केसरी कार्यालयात पोहोचले. तीथे त्यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक लोकनायक बापूजी अने यांची भेट घेतली. १४ ऑगस्टला ५७० स्वातंत्र्य सैनिकांसह ते कुमकुमबाई येथे पोहोचले. १५ ऑगस्ट १९५५ ला सकाळी ते प्रताप सिंग राणे यांच्या घरी पोहोचले. तिथे स्वातंत्र्य सैनिकांना पोर्तुगीज सरकारने कैद करून त्यांना मारहाण केली आणि नदीत फेकून दिले. अशा प्रकारे पाटील यांनी गोवा मुक्ती संग्रामात महत्वपुर्ण भुमिका अदा केली.
यासर्व स्वातंत्र्य सैनिकांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मान केला. आजच्या कार्यक्रमात इतर राज्य तसेच केंद्रशासीत प्रदेशातील स्वातंत्र्य सेनानींचाही सन्मान करण्यात आला.
तत्पुर्वी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इंशु सिंधु, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनीही स्वातंत्र्य सैनिकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.