पुणे, विशेष प्रतिनिधी :- ‘सामाजिक कृतज्ञता निधी’च्या वतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, पूर्णिमा मेहेर आणि वर्षा विद्या विलास हे 2021 च्या पुस्काराचे मानकरी आहेत. सामाजिक कृतज्ञता निधीचे अध्यक्ष डाॅ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
समाज परिवर्तनाच्या चळवळीत तळमळीने कार्य करणा-या व्यक्तींना हे राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात. संत विचारांच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन/प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक समता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आत्महत्या ग्रस्त भागातील शेतक-यांचे मनोबल वाढविणे, वृक्ष संवर्धन आणि जल संधारणाबाबत जागृती करणारे, वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना “डाॅ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्याशिवाय “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” पालघर येथील मच्छिमार हक्क आंदोलनाच्या पुर्णिमा मेहेर यांना जाहीर झाला आहे. “एस एम जोशी कार्यकर्ता पुरस्कार” मुंबई येथील नगरराज बिल समर्थन गटाच्या वर्षा विद्या विलास यांना जाहीर झाला आहे.
“सामाजिक कृतज्ञता निधी विश्वस्त मंडळा”चे अध्यक्ष डाॅ.बाबा आढाव, विश्वस्त सुभाष वारे, काका पायगुडे, अविनाश पाटील, युवराज मोहिते, पुर्णिमा चिकरमाने, अॕड जाकीर अत्तार, विजय दिवाण यांच्या निवड समितीने ही घोषणा केली.