मुंबई : चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चौपटीने वाढली. २०१४ साली राज्यात ५ हजार७०० कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते २०१७-१८ मध्ये वाढून २२ हजार ४३६ कि.मी. एवढे झाले. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या टीमचे हे यश आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲण्ड हायवेजच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव अशिष सिंह, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह केंद्र तसेच राज्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त करून श्री. मुनगंटीवार यांनी गौरव झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. एकूण तरतुदीच्या 45 टक्के रक्कमेची कामं महाराष्ट्रात होत आहेत. सावित्री नदीवरील पूल १६५ दिवसांच्या रेकॉर्ड टाईममध्ये बांधून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. मंत्री उत्तम आहेतच परंतु त्यांना साथ देणारी टीम उत्तम असेल तर विकासाच्या कामात कोणतेही अडथळे येत नाहीत. आज काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव झाला आहे. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांना अशी प्रमाणपत्रे मिळतील यादृष्टीने उत्तम काम व्हावे ही अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.