मुंबई, 2 जून : कोरोना विषाणू महामारीला तोंड देतानाच गुजरातसह महाराष्ट्रही निसर्ग या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सज्ज होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होऊन बुधवारी दुपारपर्यंत ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह ते अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे.
रायगड,मुंबई, ठाणे, पालघर या महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने वर्तवली आहे.पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमधेही पाऊस होईल.
दरम्यान महाराष्ट्रात एनडीआरएफ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 10 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत 3, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधे प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पुणे एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. एनडीआरएफच्या तुकड्यानी या भागांची पाहणी करून या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाबाबत लोकांना माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्यात किनारपट्टी जवळच्या 13 गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
गुजरातमध्ये 11 तर महाराष्ट्रात 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून अरबी समुद्रालगतच्या किनारी जिल्ह्यात या तुकड्या तैनात असल्याची माहिती एनडीआरएफ चे महासंचालक एस एन प्रधान यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे दिली आहे. हे चक्रीवादळ अती तीव्र चक्रीवादळ नसले तरी, चांगल्याची अपेक्षा करताना आपण वाईटासाठीही आपण सज्ज असले पाहिजे या मूळ तत्वाला अनुसरून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी अतिरिक्त सहा तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या एका तुकडीत 45 जणांचा समावेश असून त्यांच्याकडे झाडे आणि खांब कापण्यासाठीची साधने, संदेशासाठीची उपकरणे, हवा भरून फुगवण्याच्या बोटी, प्रथमोपचार साहित्य आणि प्राथमिक औषध संच इत्यादीने या तुकड्या सुसज्ज आहेत.
पश्चिम नौदल कमांडही सज्ज
मुंबईत, महाराष्ट्र नौदल विभाग पाच पूर बचाव पथके आणि पाणबुड्याच्या तीन पथकांसह सज्ज आहे. पूर प्रवण भागाची पूर्व पाहणी करण्यात आली असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. कारवार नौदल विभाग,गुजरात दमण आणि दीव नौदल भागातही याचप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.संबंधित विभाग आणि स्टेशन कमांडर, आपत्ती काळात जलदगतीने प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने राज्य प्रशासन,एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या संपर्कातआहेत.याशिवाय नौदलाचे डॉर्नियर विमान आणि हेलिकॉपटर पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी अल्प काळात धाव घेण्यासाठी मुंबई, गोवा,पोरबंदरअशा विविध नौदल हवाई तळावर सज्ज आहेत.
भारतीय तटरक्षक दलाची जहाजे, विमाने आणि किनाऱ्यावरची ठाणी, व्यापारी जहाजे आणि मच्छिमारांना, प्रतिकूल हवामानाबाबत सातत्याने इशारा जारी करत आहेत. बृहन्मुंबई महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अति दक्ष ठेवला आहे.मुंबईतल्या सर्व 24 प्र्भागातल्या अधिकाऱ्यानी, सखल भाग आणि संभाव्य धोकादायक भाग निश्चित करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.