सावंतवाडी, दि. ८: पर्यावरण संतुलनासाठी आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवन, उद्योगधंदे यासाठी अपरिहार्यपणे आवश्यक असलेले लाकुड उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवड आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी आज येथे केले.
वन विभाग आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्थेच्यावतीने राजवाडा येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते राजवाडा प्रांगणात सोनचाफ्याचे रोप लावण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे, ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष व निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत, उपाध्यक्षा लेखिका डॉ. सई लळीत, वनपाल एस. व्ही. सावंत, स.वि. पांगुळ, कळसुलकर हायस्कुलचे शिक्षक एन. पी. मानकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
युवराज लखमराजे म्हणाले की, आज पर्यावरणाचा समतोल हा कळीचा जागतिक मुद्दा झाला आहे. जुन्या पिढीने वृक्षांचे महत्व ओळखले होते. मात्र आजच्या काळात वृक्ष तोडण्यावर जास्त भर असतो. पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावुन ती जगवली पाहिजेत. याचबरोबर दैनंदिन जीवनासाठी, उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकुड लागते. जगप्रसिद्ध असलेली सावंतवाडीच्या चितार आळीमधील रंगीत खेळणी ही लाकडाचीच असतात. त्यासाठी पुरेसे लाकुड उपलब्ध होणे हेसुद्धा गरजेचे आहे. आजच्या नव्या पिढीला यासाठी उद्युक्त केले पाहिजे. हा कार्यक्रम आयोजित करुन चांगला संदेश दिला जात आहे, असे ते म्हणाले.
श्री. सतीश लळीत म्हणाले की, वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन केले नाही तर आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गातील मानवाच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे समतोल ढासळतो आहे. रोज नवनवीन पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. त्यांना सामोरे जाऊन मानव आणि सर्व प्राणीमात्रांच्या भविष्यासाठी निसर्गाशी जुळवुन घेणे, अनावश्यक हस्तक्षेप न करणे आणि आतापर्यंत झालेली हानी भरुन काढणे ही कामे प्राथम्याने करावी लागतील. विद्यार्थी, युवापिढी यांच्यात याबाबतची जागृती करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत. शासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक एकत्र आले तर आपण या आव्हानाला सामोरे जाऊ शकु.
वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी वनमहोत्सवामागची भुमिका सांगुन सर्वांचे स्वागत केले. श्रीमती रजनी पवार यांनी प्रास्ताविकात वन विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे, शहीद जवान यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी वनमहोत्सव काळात ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल श्रीमती पवार यांनी श्री. लखमराजे यांचे आभार मानले. आभार मानताना डॉ. सई लळीत यांनी औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्व सांगितले. यावेळी कळसुलकर हायस्कुलचे शिक्षक एन. जी. रौराळे, ए. जे. ठाकर, श्रीमती जी. एस. सावंत, कळसुलकर हायस्कुलमधील ‘हरित सेने’चे विद्यार्थी उपस्थित होते.