सन्यास घेतलात, तर तुमच्या कटकटी आणि त्रासामुळे राज्यातील जनतेची सुटका होईल – भास्कर जाधव
रत्नागिरी, प्रतिनिधी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरंच राजकीय संन्यास घ्यावा, तुम्ही जर राजकीय सन्यास घेतलात तर तुमच्या कटकटी आणि त्रासामुळे राज्यातील जनतेची सुटका होईल अशी टीका शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. कायम राजकीय सन्यास घ्या असं मी म्हणत नाही, राज्यातील कोरोना नामशेष होईपर्यंत राजकीय सन्यास घ्या असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
फडणवीस यांनी फक्त टीका आणि आरोप केले – भास्कर जाधव
याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, गेल्या दीड-पावणे दोन वर्षांमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त टीका आणि फक्त टीका, आरोप, सरकारला दोष देणे, आणि बेछूट आशा प्रकारच्या घोषणा करणे, यापेक्षा त्यांनी काही केलेलं नाही. यापूर्वी देखील अनेक विरोधी पक्षनेते होऊन गेले, त्या त्या विरोधी पक्षांनी संकटाच्या काळात, मग सत्ता कोणाचीही असो, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी खांद्याला खांदा लावून लढलेत, आणि संकटाचा सामना केलेला आहे. संकट टळलं की प्रत्येक जण राजकारण करायला मोकळा असतो. परंतु गेल्या दीड वर्षांमध्ये कोणतंही मार्गदर्शक तत्त्व, मार्गदर्शक सूचना ही देवेंद्र फडणवीस यांनी केली नाही. केवळ आरोप आणि टीका करण्याचं त्यांनी काम केलं. तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपविण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे करत आहेत. त्यामुळे हा कोरोना संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेतला तर मराठी माणूस त्यांच्या जाचापासून मुक्त होईल असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.