मुंबई : देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. देशातील वर्षानुवर्षे चालणारा भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार ऑनलाईन आणि कॅशलेस पध्दतीने सुरु केले. देशातील भ्रष्टाचार थांबविण्याचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील ही लढाई म्हणजे ऑनलाईन व्यवहाराची सुरुवात आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
केंद्र शासनाच्या निती आयोगाच्यावतीने देशभरात सुरु करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या डिजीधन मेळाव्याचा समारोप आज पालकमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, देशातील काळे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने डिजीटल पेमेंट ही योजना सुरु करण्यात आली असून सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळत आहे. डिजीटल व्यवहाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे व्यवहार हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठरणार आहेत. डिजीटल व्यवहार ही अतिशय पारदर्शी यंत्रणा असून त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे, असे आवाहन तावडे यांनी केले.
याप्रसंगी डिजीधन योजनेअंतर्गत लकी ग्राहक योजना व डिजीधन व्यापार योजना यामध्ये निवडलेल्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्लेागन व लघुकविता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.