मुंबई (शांताराम गुडेकर ) : ‘रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे.
राखी पौर्णिमा या पारंपरिक सणाची आठवण राहावी,बहीण-भावाच्या अतूट,उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा (रक्षाबंधन ) होय.भावाचा उत्कर्ष व्हावा,आपल्या भावाने आपले रक्षण करावे,ही यामागची प्रत्येक बहिणीची मंगल मनोकामना असते.
विज्ञान युगात व्हॉट्सअप,फेसबुक फोन किंवा चॅटद्वारे भेटून एकत्र सण साजरा करण्याचा तात्पुरता असा आनंद भाऊ-बहीण उपभोगत असल्याचे दिसून आहे. त्यामुळे या सणवारांचे महत्त्व कमी कमी होत चालले आहे.त्यामुळे या सणाचे पावित्र्य जपले जावे तसेच नव्या पिढीला ही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर विक्रोळी पोलीस स्टेशन येथे आपल्या सर्वांची रक्षा करणाऱ्या व सदैव कर्तव्य दक्ष राहणाऱ्या पोलीस बांधवांना विक्रोळी महिला काँग्रेस पदाधिकारी विजया वाघमारे,प्रज्ञा कदम , वैशाली गावडे तसेच महिला कार्यकर्त्या अनिता विश्वकर्मा,रेडकर ताई, ईशा ठाणेकर, पुर्वा प्रभू,मानसी तायडे यांच्यातर्फे रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व राखी बांधण्यात आली.