आर्थिक सुधारणांचे प्रणेते असणारे राव हे महान व्यक्तिमत्व- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 28 जून 2021 : माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जन्म शताब्दीनिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज आदरांजली अर्पण केली आहे. आर्थिक सुधारणांचे प्रणेते असणारे राव हे महान व्यक्तिमत्व असल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. अत्युच्च विद्वत्ता, कुशल प्रशासक, साहित्य क्षेत्रात ख्याती आणि अनेक भाषांची उत्तम जाण असलेले राव हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. दूरदृष्टी आणि नेतृत्वकला याद्वारे त्यांनी देशाच्या आर्थिक संकटातून मार्ग काढला. याआधी त्यांनी विशाखापट्टणम इथल्या सर्किट हाउस जंक्शन इथल्या राव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
राव यांनी सुरवात केलेल्या धाडसी सुधारणांमुळे गेली तीन दशके देशाच्या विकासाला गती देण्यासाठी मदत झाल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. राव यांनी सुरु केलेल्या सुधारणांची, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांना वेग दिल्याचे त्यांनी सांगितले. देशामधले लायसन्स राज संपुष्ठात आणण्याचे श्रेय राव यांच्याकडे जाते असे सांगून राव हे भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार होते. राव यांच्यामुळे, जागतिक व्यापार संघटनेत भारताचा सुलभ प्रवेश झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राव यांना भाषांमध्ये रुची होती. या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानामध्ये, वेई पदगालू या महान तेलगु कादंबरीचा त्यांनी सहस्र फान या केलेल्या अनुवादाचा आणि ‘पण लक्षात कोण घेतो’ या प्रसिद्ध मराठी कादंबरीचा ‘अबला जीवितम’ या तेलगु अनुवादाचे केलेले प्रकाशन यांचा समावेश आहे.
राव यांच्या सारख्या महान नेत्याला योग्य तो मान सन्मान लाभला नसल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी खंत व्यक्त केली. राव यांच्या जन्म शताब्दी निमित्त, राष्ट्र उभारणीसाठीचे त्यांचे योगदान सामोरे आणूया असे ते म्हणाले.
राष्ट्राची संस्कृती, वारसा आणि राष्ट्र उभारणीसाठीचे महान नेत्यांचे योगदान लक्षात घेतल्याविना कोणत्याही राष्ट्राची वेगवान प्रगतीकडे वाटचाल होऊ शकत नाही असे ते म्हणाले.














