मुंबई : वनक्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व इतर कामांसाठी जमीन वळती करताना निकष पूर्ण होणे आवश्यक असून निकष पूर्ण होत असल्यास तात्काळ जमीन वळती करुन कामांना गती दिली जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिले.
वनविभागाच्या अख्यत्यारित वनक्षेत्रातील प्रलंबित कामांच्या अनुषंगाने सदस्य शंभुराज देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, नळ पाणीपुरवठा योजना व इतर कारणांकरिता वनक्षेत्र वळते करुन शासकीय यंत्रणेमार्फत कामे करण्यासाठी केंद्र शासनाच्या वन संवर्धन कायद्यानुसार निकषांचे पालन होणे आवश्यक असते. 1 हेक्टरपर्यंत वनक्षेत्र वळतीकरणाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार उप वनसंरक्षकांना आहेत. त्यातही निकषांचे पालन होणे गरजेचे आहे. वनक्षेत्र वळते करावयाचे असल्यास संबंधित 1 हेक्टर क्षेत्रात 75 पेक्षा कमी झाडे असावीत हाही एक महत्त्वाचा निकष आहे.
ते पुढे म्हणाले, पाटण व कराड तालुक्यातील (जि. सातारा) डोंगरी व दुर्गम भागातील गावातील पाणीपुरवठा योजना व इतर कामांच्या 13 पैकी निकषात बसणारे 2 प्रस्ताव यापूर्वीच मान्य करण्यात आले असून 2 प्रस्तावांना लवकरच मान्यता दिली जाईल. इतर 9 प्रस्ताव निकषांमध्ये बसविण्यासाठी आवश्यक ती पूर्तता केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनक्षेत्रातील प्रलंबित कामांच्या अनुषंगाने सदस्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून अधिवेशनानंतर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्यात येईल. सदस्यांनी प्रलंबित कामांबाबतची माहिती आपणाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करत असताना काही वेळा अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रयत्न केला जातो. अशा प्रसंगी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी त्यास मज्जाव करणे अपेक्षित आहे. मात्र, वनक्षेत्रात नियमानुसार काम होण्यास कोणी अधिकारी बाधा आणत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव नाईक, बाळासाहेब पाटील, गणपतराव देशमुख यांनी सहभाग घेतला.