मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत त्वरित निर्णय करण्यात यावा वा तो निर्णय न होण्यामागील कारणे जनतेला कळावीत, त्यामुळे जनतेतील संभ्रम आणि अस्वस्थता दूर होईल, अशी आग्रही मागणीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्यातील चार राजकीय पक्षांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से) महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (से) यांचा त्यात समावेश आहे.
राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात या राजकीय पक्षांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्यांनी पदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यात कोणत्यातरी सभागृहाचे सदस्यत्व मिळविणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सद्य स्थितीत कोणत्याही निवडणूका घेणे शक्य नाही. त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेवरील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर, त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस ९ एप्रिल रोजीच आपल्याकडे केली आहे. तसेच २८ एप्रिल रोजी पुन्हा त्याबाबत स्मरणपत्र दिले आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आपण जाणताच! राज्यातील सारी जनता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे, धडपडत आहे.
या अशा आणीबाणीच्या प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याच पदाविषयी शंका आणि संभ्रम राहणे योग्य नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून आज २० दिवस झाले तरी आपल्या निर्णयाची माहिती राज्यातील जनतेला मिळू शकलेली नाही.
वास्तवात सद्यस्थिती लक्षात घेता, उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घेऊन त्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे राज्याचे प्रमुख या नात्याने आपल्याकडून जनतेला अपेक्षित आहे.
मात्र, २० दिवस होऊनही निर्णय न झाल्याने राज्यातील जनतेत संभ्रम आणि अस्वस्थतेची भावना आहे.त्याकडेच आपले लक्ष वेधण्यासाठी एकप्रकारे जनतेच्या वतीने आम्ही हे पत्र आपल्याला लिहित आहोत. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीला आता २० दिवस झाले आहेत. याबाबत आपण काय निर्णय घेतला आहे, हे राज्यातील जनतेला विनाविलंब कळावे, ही विनंती आहे. आपला निर्णय न होण्यामागे काही तांत्रिक अडचण असेल, राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाबाबत काही आक्षेप वा त्रुटी असतील आणि त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असेल तर तेही राज्यातील जनतेला कळले पाहिजे.
तरी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत त्वरित निर्णय करण्यात यावा वा तो निर्णय न होण्यामागील कारणे जनतेला कळावीत, त्यामुळे जनतेतील संभ्रम आणि अस्वस्थता दूर होईल, ही विनंती, असे पत्र भाई जयंत पाटील, प्रा. शरद पाटील, राजू शेट्टी, न्या. बी. जी. कोळसे पाटील, श्याम गायकवाड, प्रताप होगाडे, राजू कोरडे, प्रभाकर नारकर
या प्रमुख नेत्यांनी लिहीले आहे.