रत्नागिरी, प्रतिनिधी : केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते आमदार आशिष शेलारही सहभागी झाले असून शेलार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.
यावेळी शेलार म्हणाले की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. ज्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. आता राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंविरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही शेलार यांनी दिला.