
रत्नागिरी, प्रतिनिधी
उदय सामंत पक्षाने विविध पदं तुम्हाला दिली, पण तुम्ही गद्दारी केली अशी जोरदार टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार उदय सामंत यांच्यावर केली आहे. उदय सामंत यांनी मातोश्रीच्या अन्नाची जाण ठेवली नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले. रविवारी रत्नागिरी तालुक्याचा शिवसेनेचा भव्य मेळावा शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार व उपनेते राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रदीप बोरकर, उदय बने, व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले बाकी, आठ वर्षापूर्वी म्हणजे कालपरवा शिवसेनेत आलेले आ. सामंत म्हणतात सेनेला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. केवढी मोठी भिष्माचार्यांची प्रतिज्ञा केली. राष्ट्रवादीतून येताना खा. शरद पवारांच्या तोंडाला यांनी पाने पुसली. उध्दव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आपले केले. परंतु यांनी विश्वासघात केला.
ज्या रश्मीताई ठाकरेंनी घरातला समजून स्वत:च्या हाताने जेवायला वाढलं, आदित्य ठाकरेंनी मोठा भाऊ समजून आपल्या घासातील अर्धी फ्रॅंकी तुम्हाला दिली. या आमदार उदय सामंत यांनी गद्दारी केली. तुम्ही पक्षात आलात कधी, आठ वर्ष झाली. तुम्हाला आमदार केल. मंत्री केलं, पक्षाचे उपनेते केले. प्रसंगी राजन साळवींसारख्या निष्ठावांनांवर अन्याय झाला. तुम्ही काय केलतं, खोऱ्याने ओढलत. आता बस्स् बंडखोरांना यापुढे शिवसेनेचे दरवाजे कायमस्वरुपी बंद असतील अशी बोचरी टिका खासदार विनायक राऊत यांनी केली.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सासुरवास कमी नव्हता. गेली दोन वर्ष मीही हे भोगत होतो. आ. सामंत आता तिकडे गेल्याने येथील नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच तणावमुक्त झाले आहेत. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून देण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा असे सांगतानाच गद्दारांना आता सेना परिवारात परत प्रवेश नसल्याचेही खा. राऊत यांनी स्पष्ट केले.
















