मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी 1% लोकांकडेच देशातील जमीन मोठया प्रमाणवार होती. परंतु विनोबानी भुदान चळवळी साठी 60 हजार किलोमीटरची पदयात्रा केली, नेहरूंनी कसेल त्याची जमीन या तत्वा नुसार कुळकायदा आणला, त्यानंतर सिलिंग ऍक्ट आणून सर्वसामान्य जनतेला जमिनीचे मालक केले. इंदिरा गांधींच्या काळात झालेले जमीन वाटप व पुढे वनहक्क कायाद्याद्वारे कसत असलेल्या आदिवासीना जमीन मिळाली.”, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) ने शहीद भगत सिंग अभिवादन सभेचे मुंबई सर्वोदय मंडळ, ग्रॅण्ट रोड येथे आयोजन केले होते. त्यावेळी सपकाळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. गांधीं विचारांचे अभ्यासक श्री जयंत दिवाण, मासचे ऍड गिरीश कटारिया, चित्रा राणे, संग्राम पेटकर यांनी सर्वं उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य डॅा. संजय मंगला गोपाळ उपस्थित होते.
डॅा. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, महात्मा गांधी, डॅा. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग हे आपापल्या प्रेरणा, वैचारिक जडणघडण व आयुष्यात आलेले अनुभव यांच्या आधारे स्वातंत्र्य, समता व लोकशाही यासाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहिले. गांधी – भगतसिंग यांचा आग्रह स्वातंत्र्य व लोकशाही यांचा होता. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता सामाजिक समतेचा हक्क व लोकशाहीचा! मात्र अस्रृश्यता निवारण व जातीप्रथेचा अंत यावर या तिघांचे एकमत होते. त्यांचे आग्रह परस्परपूरक होते. “मला समजून घेणारा एकच माणूस म्हणजे महात्मा गांधी”, असे डॅा. बाबासाहेब सांगत. पुणे कराराच्या वेळी दोघांतील सुरुवातीच्या तीव्र मतभेदांनंतर झालेले एकमत अभूतपूर्व होते. या महामानवांच्या त्यांच्या कार्यकाळाच्या परिप्रेक्ष्यातील वैचारिक मैत्र समजून घेऊन पुढील काळात समन्वयाचे समाजकारण मजबूत करण्याचे काम एकीकडे कॅांग्रेस व तत्सम पक्षांनी करावे तर दुसरीकडे जन आंदोलनकारी संस्था – संघटना – आंदोलनांनी आपसातील समन्वय वाढवावा.”
याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील योगदाना बद्दल श्री जनार्दन जंगले व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करणारे श्री प्रभाकर नारकर, नम्रता जाधव, संग्राम पेटकर, सुरेश रसम व सहकाऱ्यांचा श्री हर्षवर्धन सपकाळ व संजय मं. गो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन मासचे दिनेश राणे व आभार प्रदर्शन डॉ यु. व्ही. महाडकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मासचे पदाधिकारी ऍड गिरीश कटारिया, चित्रा राणे,डॉ यु. व्ही. महाडकर, संग्राम पेटकर, दिनेश राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.