(सदर लेख ज्येष्ठ राजकीय पत्रकार उदय तानपाठक यांनी लिहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेले संबंध, त्यांच्या आठवणी या लेखात तानपाठक यांनी मांडल्या आहेत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन त्यानिमित्त लेखकाच्या परवानगीने लेख प्रकाशीत) पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुढारी
बातमीदाराच्या कारकिर्दीत काही प्रसंग मोठे विचित्र असतात. म्हणजे कितीही अलिप्त राहून बातमी द्यायची म्हटली, तरी तसे करताच येत नाही. बातमी आनंदाची असेल,तर आपल्यालाही आनंद होतो, दु:खाची असेल, तर ती देताना दु:ख होतेच! बाळासाहेबांच्या निधनाची बातमी अशीच! ती लिहीताना खूप वाईट वाटत होते. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. कधी ना कधी या घटनेचे वृत्तांकन करणे नशिबी येणार आहे, याचा अंदाज साऱ्याच पत्रकारांना आला होता. विशेषत: गेले काही महिने बाळासाहेबांच्या तब्येतीत जे चढ-उतार झाले, त्यामुळे आता काहीही होऊ शकते, याची कल्पना आली होती. गेल्या आठवडयात मातोश्रीच्या बाहेर रात्ररात्रभर उभे राहताना आता आपल्या मनाची तयारी झाली आहे, असे वाटतही होते, पण जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळ केशव ठाकरे यांचे देहावसान झाले, तेव्हा अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकले की या क्षणासाठी आपली बिलकुल तयारी झालेली नव्हती. या मृत्यूचे दुःख पचवणे कठीण जाणार आहे.
गेले अनेक दिवस मृत्यूशी एकाद्या योद्ध्यासारखे झुंजत झुंजत बाळासाहेबांनी अखेर वार्धक्याने जर्जर झालेला देह ठेवला, तेव्हा साक्षात काळानेदेखील त्यांना सलाम केला असेल. लाखो शिवसैनिकांच्या प्रार्थनेचे बळ आणि खुद्द बाळासाहेबांचे त्यांच्याशी बांधले गेलेले अतूट रेशीमधागे यांच्या बळावर बाळासाहेबांनी काळाला जवळपास नमवलेच होते. पण अखेर अटळ ते घडलेच.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले आहे याचा हिशोब आता मांडला जाईल, तेव्हा ते कल्पनेपलिकडचे असेल यात शंका नाही! राजकारण तर पोरके झाले आहे. या पोरकेपणामुळे होणारे राजकीय परिणाम आणि उलथापालथी याचेही यथावकाश विश्लेषण होईल. त्यावर अनेक चर्चा, परिसंवादांचे उधाण येईल. बाळासाहेब याच्या कितीतरी पलिकडचे होते, याचा अनुभव मध्यम वयातील अनेक पत्रकारांनी घेतला आहे.
बाळासाहेब होते, म्हणून पत्रकारितेतली रंगत, गंमत होती. ती गंमत, ती रंगतच आता हरपली आहे.आम्हा बातमीदारांसाठी बाळासाहेब पहिल्यापासूनच आकर्षणाचा बिंदू राहिले. मी पत्रकारितेत आलो, तेव्हा बाळासाहेब काय किंवा वसंतदादा वा शरद पवार या मोठया नेत्यांबद्दल एक कुतूहल मनात होतेच! बातमीदारीच्या निमित्ताने या थोर माणसांना किमान जवळून बघावे, त्यांना जाणून घ्यावे असे पहिल्यापासून वाटायचे. त्यातही बाळासाहेबांचे आकर्षण जास्त. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख दोन्हीही अभ्यास कराव्यात अशा गोष्टी. त्या ‘बीट’ वर काम करण्याची प्रत्येक बातमीदाराची इच्छा असते. माझीही होती. माझे दैव थोर की मला बाळासाहेबांना केवळ बघताच आले असे नाही, तर त्यांचा स्नेहही लाभला.
माझ्या बातमीदारीच्या उण्यापुऱ्या तीन दशकाच्या काळात खूप वेळा बाळासाहेबांशी बोलणे झाले. गप्पा झाल्या. याक्षणी तो आठवणींचा पट उलगडू लागला आहे. मला आठवते आहे ते 1991 साल. बातमीदारीत माझी पावले न अडखळता पडायला लागली होती. काही एक अनुभव गाठीला बांधून मी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातच नोकरीला लागलो. अशोक पडबिद्री तेव्हा कार्यकारी संपादक होते. (संजय राऊत यांचा संपादक म्हणून उदय तेव्हा व्हायचा होता!) पडबिद्रींनी मला राजकीय बीटवर पाठवले. मी कामालाही लागलो. आधीच्या वृत्त्तपत्रातील या बीटचा अनुभव माझ्याजवळ होताच! दादरच्या नागू सयाजी वाडीतल्या सामनाच्या कार्यालयात तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांचा राबता असे. त्यांच्यापैकी अनेकांशी माझी आधीपासूनच ओळख होती. अशोक पडबिद्री यांनी मला सामनामध्ये आणल्यानंतर अनेकांच्या वक्र भुवया माझ्या दिशेने वळायच्या.
त्याच काळात एकदा तेथे आलेल्या राज ठाकरेंनी तर मला थेट ‘तू इथे काय करतोयस?’ असे विचारलेही होते.
एखाद्या राजकीय घटनेवर बाळासाहेब सामनातून आपली प्रतिक्रीया देत असत. मातोश्रीवरून त्यांचा फोन पडबिद्रींना येत असे आणि फोनवर खुद्द बाळासाहेब त्यांची प्रतिक्रिया देत किंवा मजकूर सांगत. पडबिद्री मग तो लिहून घ्यायचे. नीट शब्दांकित करून तो पुन्हा साहेबांना वाचून दाखवायचा, अशी पध्दत होती. कधीतरी एकदोन ठराविक पत्रकारांना हे काम करावे लागे. ज्याच्यावर हे काम पडे, त्याच्या पोटात गोळाच येत असे. किंबहुना ‘मातोश्री’ वरून फोन आला, तरी कार्यालयात एक प्रकारचा तणाव निर्माण होई. अशाच दिवसात बाळासाहेबांना एक प्रतिक्रीया द्यायची होती. पडबिद्रींनी हे काम काझ्यावर सोपवले. त्यांच्याच केबिनमध्ये मी बाळासाहेबांचा फोन घेतला. मी एकतर नीट लिहून घेईन की नाही बाळासाहेबांशी कसा बोलेन, याची काहीशी धाकधूक पडबिद्रींच्या मनात असावी. त्दयांनी आधीच मला घाबरू नकोस, साहेबांचे नीट ऐकून लक्षपूर्वक लिहून घे, अशा सूचना त्यांनी मला केल्या. पडबिद्रींनी मातोश्रीवर फोन केला, बाळासाहेबांना माझे नाव सांगितले, आणि फोन माझ्याकडे दिला. आता हा काय करतोय अशा चेहऱ्याने ते समोर बसून पाहू लागले.
मी मात्र बाळासाहेबांचा तो पहिला फोन घेतला, तोच मुळी बिनधास्तपणे. ‘नमस्ते साहेब, जय महाराष्ट्र…कसे आहात?’ अशी सुरवात करून मी बोलू लागलो, तर समोर पडबिद्रींना घाम फुटला असावा. बाळासाहेबांशी हा असा काय बोलतोय, असा वैताग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गंमत म्हणजे खुद्द शिवसेनाप्रमुख माझ्याशी अत्यंत खेळीमेळीने आणि कमालीच्या स्नेहाळ आवाजात बोलत होते. त्याच वर्षी, म्हणजे विधानसभेचे नागपूर अधिवेशन ‘कव्हर’ करण्यासाठी पडबिद्रींनी मला धाडले. याच अधिवेशन काळात छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. तेव्हाच्या सगळया घडामोडी शिवसेनाच काय पण महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या होत्या. सामनातून याला कशी प्रसिध्दी दिली जाणार याची मला कल्पना नव्हती. मी आपल्या नेहमीच्या पध्दतीने विधानसभेतील कामकाजाच्या बातम्या पाठवू लागलो. इंटरनेट वगैरे कल्पनेतही नसण्याचा तो काळ. फॅक्सलाही खूप खटपट करावी लागत असे. हाताने कॉपी लिहून ती फॅक्सवरून पाठवावी लागत असे. आपण पाठवलेली बातमी कशी आलीय याची मला उत्सूकता होतीच. दुसऱ्या दिवशी तेव्हा अंक येत असे. पहिल्याच दिवशी माझी बातमी पाहिली आणि मी दचकलोच! विधानसभेतल्या कामकाजाची मी पाठवलेली बातमी पडबिद्रींनी खास शिवसेना स्टाईलने आणि स्वत:चा टच देऊन प्रसिध्द केली होती. त्यावेळी सामनाची ही स्टाईलच होती. शिवसेनेच्या या मुखपत्रात येणाऱ्या बातम्या अतिशय कॉमेण्टेटिव्ह असत. ‘मराठा’ चे मॉडेल बहुधा संपादकांच्या डोळयासमोर असावे! बातमीदाराने पाठवलेल्या बातमीचे तिथे कार्यालयातील डेस्कावर रूप बदलून जाई. म्हणजे वृत्तावर नाव बातमीदाराचे, पण मजकूर मात्र ‘अस्सल’ वाणाचा, असा मामला होता. त्या सुप्रसिध्द सामना शैलीतील बातम्यांची नागपूरातल्या विधानभवनात एकच चर्चा होत असे. या बातम्यांमुळे सामनावर हक्कभंग देण्यात आला. आत माझ्यावर कारवाई होते की काय अशी भीती निर्माण झाली. मी थेट मनोहर जोशीसरांमार्फत माझी नाराजी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्याच कानावर घातली. आश्चर्य म्हणजे बाळासाहेबांनी अत्यंत आस्थेने माझी बाजू ऐकून मला अभय दिले. ‘तुझे बरोबर आहे, मी बोलतो तुझ्या संपादकांशी’ असे म्हणून त्यांनी मला जो दिलासा दिला, त्याने मी कायमचाच त्यांचा चाहता झालो. वास्तविक तो त्यांच्यासाठी खूप कठीण काळ होता. छगन भुजबळ नावाचा त्यांचा उजवा हाता कटून पडला होता. त्या काळात त्यांनी माझ्यासारख्या तुलनेने नव्या पत्रकाराची दखल घेतली नसती तरी काय होणार होते?
युतीचे सरकार येण्याआधीचा बाळासाहेबांच्या दौऱ्यांचा झंझावात आठवतो आहे. मराठवाड्यात त्यांचा दौरा होता. या दौऱ्याला नामांतराची किनार होती. बाळासाहेबांची सभा होती औरंगाबादला. सभेआधी ते शहर पार भगवे झाले होते. खवळून उठले होते. औरंगाबादेत बाळासाहेबांचे अभूतपूर्व स्वागत झाले, तेव्हा त्यांच्या त्या दौऱ्यात मी ‘पुढारी’चा प्रतिनिधी म्हणून सामील झालो होतो. तिथल्या एका स्थानिक सांयंदैनिकाने ‘ बाल ठाकरे का ठंडा स्वागत’ असा मथळा देऊन तद्दन खोडसाळ मजकूर छापला होता. बाळासाहेब त्यामुळे खवळून उठले नसते तरच नवल! दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची एका पंचतारांकित हॉटेलात पत्रकारपरिषद होती. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी बाळासाहेबांनी ‘तो’ अंक फडकावत त्याच्या पत्रकाराला बाहेर जाण्यास फर्मावले. झाले, त्याचवेळी शिवसेनाविरोधक पत्रकारांचा एक गट हजर होता. बाळासाहेबांनी त्या पत्रकाराला बाहेर जाण्यास सांगताच या गटाच्या अन्य पत्रकारांनीही बहिष्काराची भूमिका घेतली, आणि सर्वजण उभे राहीले. परिषदेतले वातावरण तंग झाले. एकाने तर बाळासाहेबांना सुनावायलाही सुरूवात केली. सेना नेते आणि खुद्द बाळासाहेब शांतपणे बसून होते. दौऱ्याच्या सुरूवातीलाच असा अपशकून होणे त्यांना ठीक वाटत नव्हते. तेवढयात पत्रकारपरिषदेच्या हाॅलच्या बाहेरच्या भागात काही पत्रकारांना मारहाण झाली. एका महिला पत्रकाराचे डोके फुटले…वातावरण चिघळले. काही पत्रकारांनी शिवसेनेच्या बहिष्काराची भूमिका लावून धरली, आणि पत्रकारपरिषदेवर बॉयकॉट केला. मी सरळ बाळासाहेबांसमोरचा माईक उचलून बोलायला सुरूवात केली. त्या पत्रकाराने चुकीची बातमी दिली आहे. हा खोडसाळपणा आहे, आणि त्याचे समर्थन आपण करू शकत नाही, मी बातमीदार आहे, वृत्तांकनांसाठी आलो आहे, अशा राजकीय बहिष्कारांसाठी नाही, अशी भूमिका घेऊन मी मात्र परिषदेत बसून राहिलो. या बहिष्कारामागील राजकारण मला ज्ञात होते, म्हणूनही ही भूमिका मी घेतली होती. माझ्यापाठोपाठ अनेकजण विरोधकांचा दबाव झुगारून पत्रकारपरिषदेत बसून राहीले, आणि ती पत्रकारपरिषद पार पडली. बाळासाहेबांना माझा हा बेधडकपणा आवडला असावा. त्यांनी मला त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी बोलावून घेतले. माझी पाठ थोपटली. चौकशी केली. तिथे स्वर्गीय मीनाताई ठाकरेदेखील होत्या. अत्यंत प्रेमळपणाने त्या दोघांनी माझी विचारपूस केली. त्या भेटीत बाळासाहेबांनी महिला पत्रकारास झालेल्या मारहाणीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी,असे घाबरत घाबरत मी सुचवले. आश्चर्य म्हणजे सुरवातीला माझी सूचना उडवून लावणाऱ्या बाळासाहेबांनी मलाच डिक्टेशन दिले आणि दिलगिरीची ‘कॉपी’ दिली!
यापुढे आमचे संबंध बातमीपुरते राहिले नाहीत. शाब्दिक कोटया, फिरक्या, गप्पा, आस्थेवाईक बोलणं, फोनाफोनी, नकला असे अनेक रंग त्यात भरले गेले. त्यांच्या विनोदबुध्दीबद्दल मी काय सांगावे? जातिवंत प्रतिभावान असा तो व्यंगचित्रकार. त्यांच्या कॉमेंटस थेट असायच्या. कधी कधी मी त्यांना म्हणायचो, ”साहेब तुम्ही व्यंगचित्रकार राहिला असता, तरी जागतिक कीर्तीचेच झाला असता. तुम्ही कंटिन्यू करायला हवं होतंत.” त्यावर ते थोडे हळवे होत. त्यांनाही बहुधा स्वतःच्या कलेबद्दल बेहद्द आत्मविश्वास आणि प्रेम होतं. ‘नाही रे, हे हात आता थरथरतात!’ असे सांगताना स्वतःच्या हाताकडे ते अशा नजरेने पाहात की जणू दुसऱ्याच माणसाचे ते हात असावेत…
माझे लिखाण त्यांना पसंत नसले, तर ते संतापत. ‘गाढवा, हे तुला कोणी लिहायला सांगितलं होतं?’ म्हणून कानही उपटत असत. एकदोनदा तर त्यांनी माझ्या संपादकांकडे माझी तक्रारही केली होती. पण त्यामुळे आमच्या वैयक्तिक संबंधात काहीही कडवटपणा आला नाही. तो अर्थात बाळासाहेबांनी येऊ दिला नाही.
शरीराने थकलेले बाळासाहेब ‘मातोश्री’ बाहेर क्वचितच जाऊ लागले. त्यांची तोळामासा प्रकृती पाहून मनात कालवाकालव व्हायची. पण स्वतः बाळासाहेब धीरोदात्तपणे सगळयाला तोंड देत होते. ‘माझ्यावर नुसता गोळीबार चालू आहे’ हे त्यांचे आवडते कॉमेण्ट होते. त्याही अवस्थेत ते विनोद वगैरे करू शकत हे आश्चर्यच होते.
अवघ्या सहाच महिन्यांपूर्वी आमच्या संपादकाबरोबर मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो. अघळपघळ स्वागत करून त्यांनी त्यांच्यावर नव्याने आलेले एक पुस्तक मला भेट दिले. त्यावर ‘माझ्या पत्रकारितेतील जुन्या मित्रास’ असे कोणाकडून तरी लिहून घेतले आणि थरथरत्या हाताने स्वाक्षरी मात्र स्वतः केली. ‘थोडं थांब…बरं’ असे सांगून त्यांनी फोटोग्राफरला सांगून खास दोघांचा फोटो काढून घेतला. नंतर फोन करून सांगितले,’अरे फोटो मस्त मोठे करून आणलेत. तुला वेळ देतो…ये आणि घेऊन जा!’ ते फोटो अजून ‘मातोश्री’वरच कुठेतरी असतील. बाळासाहेबांची वेळ मिळालीच नाही. मातोश्रीवर जाणे राहीलेच! फोटो नसले तरी थरथरत्या वृध्द हाताने केलेली पुस्तकावरची त्यांची एक स्वाक्षरी माझ्यापाशी आहे, आणि त्या पुस्तकाच्या पानापानाला पितृत्वाचा गंध आहे…
बाळासाहेब आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे किस्से मात्र माझ्यापाशी राहीलेत! बाळासाहेब हे तरूणांनाही लाजवणाऱ्या उत्साहाचा खळखळणारा झरा होते. शिवसेना हा त्यांचा श्वास होता आणि ध्यासही! शिवसैनिकांसाठी तर ते देवतुल्यच होते. पण आम्हा पत्रकारांसाठी ते होते एक आयकॉन!