ठाणे : रेल्वेच्या दोन्ही बाजूला इतरत्र पडलेला कचरा, डोळ्यात भिनणारे बकालपण, पडीक भिंतीवरील अवाचनीय संदेश हे चित्र आता बदलणार आहेत. रेल्वेच्या दुतर्फा परिसर साफ करून तिथे रंगरंगोटी आणि पेंट दि वॉल मोहिम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे पालिका आयुक्तांनी घेतला आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असेल. मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वेने प्रवास करून समस्या जाणून घेतल्या. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा साफ करणे, झोपडपट्टायाच्या बाजूला पडलेला कचरा उचलणे, तिथे रंगरंगोटी करणे, संरक्षक भिंतीवर पेंट दी सिटी वॉल मोहिमे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियामधील कँगपूंग पीलंग, पोलंडमध्ये झलिपी, स्पेनमध्ये जुझकार, ब्राझिलमध्ये रियो आणि मेक्सिकोमधील पचुका’ सलास पल्मितास या गावांची संपूर्ण रंगरंगोटी करून त्या गावांना आकर्षक बनविण्यात आलेआहे. त्याच धर्तीवरपेंट दि सिटी वॉल ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. जेणेकरून ठाणेते दिवा आणि दिवा ते ठाणे असा प्रवास करणा-या प्रवाशांना प्रसन्नता वाटेल. तसेच रूपादेवी पाड्याचा विकास देखील याच धर्तीवर केला जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी सर्वेक्षण करून संकल्पचित्र आणि कृती आराखडा एका महिन्यात तयार करून लवकरच काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालिकेचे अधिकारी, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, मुंबईच्या प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर रूबल नागी, प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, वास्तुविशारद प्रविण जाधव उपस्थित होते.