
शिक्षण सेवेत येणार्या शिक्षकांना शासनाकडून प्रमाणित करण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) बंधनकारक करण्यात आले. या परिक्षेसाठी येणार्या सर्व उमेदवारांना शिक्षण विभागाकडून आवश्यक असलेल्या सर्व सुचना देण्यात आलेल्या होत्या. ज्यावेळी उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरली होती. त्यावेळीच या परिक्षेचे नियम व त्यासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सांगण्यात आले होते. पेपर १ व पेपर २ अशी दोन सत्रात परिक्षा घेण्यात आली. गतवर्षी या परिक्षेचा पेपर फुटल्याने गोंधळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी सर्व परिक्षा केंद्रांवर व्हिडीओ चित्रिकरणासह कडक नजर ठेवण्यात आली होती. या परिक्षेच्या पेपर १ साठी १३१३ उमेदवार पात्र होते. त्यापैकी १२०४ उमेदवार हजर होते तर १०४ उमेदवार गैरहजर राहिले. तसेच पेपर २ साठी ११३२ उमेदवार पात्र होते. त्यापैकी परिक्षेसाठी १०४१ उमेदवार हजर होते तर ९१ उमेदवार गैरहजर राहिले होते. जिल्हाभरातून अनेक उमेदवार उशीराने तर काही उमेदवारांकडे परिक्षा परवानगी पत्र असूनही त्यावर नमुद केलेले ओळखपत्रांचा अभाव दिसून आला. अशा सर्व उमेदवारांना परिक्षा केंद्रात यंत्रणेने मज्जाव केला.
नियोजनात काटेकोरता राखण्याच्या सूचना सर्व परिक्षा केंद्रावर देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे जे उमेदवार वेळेत आले नाहीत, ओळखपत्र आणली नाहीत त्याला शिक्षण विभाग जबाबदार नसल्याचे स्पष्टीकरण प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिले.