मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी क्षयरोगाची तीव्रता समजावून घेऊन आपल्या प्रभागातील क्षयरोग निर्मुलनासाठी सक्रीय सहभाग घेतला तर क्षयरोग नियंत्रण मोहिमेला अधिक चांगले यश मिळू शकेल, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. दादर येथील शिवाज पार्क येथे मुंबई महानगरपालिका व आय.ए.पी.पी.डी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात नगरसेवकांसाठी क्षयरोग नियंत्रणाबाबत मंगळवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, विधी समिती अध्यक्ष अॅड. सुहास वाडकर, आय.ए.पी.पी.डी, नवी दिल्लीचे कार्यकारी सचिव मनमोहन शर्मा, चॅलेज टि.बी. ‘द युनियन’ चे संचालक डॉ. इमरान सय्यद, उप आयुक्त (आरोग्य सेवा) सुनिल धामणे, संचालक (वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालये)डॉ. अविनाश सुपे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. प्रदिप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
क्षयरोगाचे निर्मुलन होणे किती आवश्यक आहे, याची तीव्रता आज याठिकाणी आल्यानंतर लक्षात आल्याचे महापौर म्हणाले. कार्यशाळेला गैरहजर असलेल्या नगरसेवकांना महापालिका सभागृहात महापौरांनी पाच मिनीटे मार्गदर्शन करण्याची महापालिका आयुक्तांची सूचना स्वागर्ताह असल्याचे महापौरांनी सांगितले. पालिका वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ.अविनाश सुपे यांनी क्षयरोग बाबत अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. तसेच लोकप्रतिनिधींचा आपआपल्या प्रभागात थेट संपर्क असल्याने आपल्या प्रभागातील क्षयरुग्णांना औषधांचा कोर्स हा पूर्ण करावाच, मध्येच औषध घेणे बंद करु नये, आपल्याकडे येणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, अशी सूचना त्यांनी केली. तर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भारताच्या लोकसंख्येच्या १ टक्के लोकसंख्या ही मुंबईची असून यामध्ये क्षयरुग्णांची लोकसंख्या ही अडीच टक्के आहे ही मुंबईकरांसाठी चिंताजनक बाब असल्याचे म्हटले. केंद्रसरकारला २०२५पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करायचा असून त्याप्रमाणे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आता यापुढे सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातील क्षयरुग्ण असा कोणताही भेदभाव न होता क्षयरुग्णांची नोंद घेऊन त्यांच्या उपचाराचा पाठपुरावा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही आता महापालिका, शासनाची आहे. क्षयरोगाबाबतचा उपचार कितीही महागडा असला तरी क्षयरुग्णांनी त्याला घाबरुन न जाता यावर मोफत उपचार करण्यात येत असल्याची जाणीव ठेवावी. तसेच लोकप्रतिनिधींनी सुध्दा क्षयरुग्णांच्या उपचाराबाबत प्रशासनाला प्रश्न विचारुन या आजाराबाबतच्या तीव्रतेची जाणिव करुन द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
आय.ए.पी.पी.डी, नवी दिल्लीचे कार्यकारी सचिव श्री. मनमोहन शर्मा तसेच चॅलेज टि.बी. ‘द युनियन’ चे संचालक डॉ.इमरान सय्यद यांनी आपल्या भाषणातून क्षयरोगाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आमचे मुख्य उददिष्ट असल्याचे सांगितले. तसेच याप्रकारच्या कार्यशाळा आपण संपूर्ण भारतात आयोजित करीत असून नागरी वस्तीतील कार्यशाळेचा शुभारंभ हा प्रथमच मुंबईत आज करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुपे यांनी क्षयरोग निर्मुलनाबाबत महापालिका राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.















