
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपालिका एक लाख लोकसंख्या गटात पश्चित विभागात सर्वप्रथम आली असून देशपातळीवर दहावा क्रमांक मिळवत स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी नगरपालिका ठरली आहे.
आज दिल्ली येथून या स्वच्छ भारत सर्वेक्षणातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्बन अफेअर्स अँड हाऊसिंग मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या दिल्लीतून ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
रत्नागिरी नगरपरिषदेला 50 हजार ते 1 लाख नागरी संख्येच्या गटात स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील एकूण 42 शहरांची निवड करण्यात आली.
रत्नागिरी शहराने सलग तिसऱ्या वर्षी यात स्थान प्राप्त केले आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणी संकलन करुन त्याचे एकत्र गोळा झाल्यानंतर केलेले वर्गीकरण, शहरात 100 टक्के कचरा संकलन, कचऱ्यातून खतनिर्मिती, प्लास्टीकवर प्रक्रिया तसेच घातक कचऱ्यावर प्रक्रिया आदी प्रकल्प उभे केले आहेत.
शहराने ओडीएफ+ (ODF++) मानांकन मिळविले असून कचरा मुक्तीबाबत शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. शहराचे प्रथम नागरिक प्रदीप (बंड्याशेट) साळवी यांच्या मार्गदर्शनात सर्व नागरिक, पदाधिकारी, शाळा, संस्था, एनजीओ तसेच पत्रकार यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे तसेच नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले.