Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी आज (मंगळवार, दिनांक ०६ एप्रिल, २०२१) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्री. सदानंद (सदा) गजानन परब हे १३ मते मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या श्रीमती स्वप्ना विरेंद्र म्हात्रे यांना १० मते मिळाली.
सुधार समितीच्या एकूण २६ सदस्यांपैकी २३ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे श्री. आजमी मोहम्मद अश्रफ मोहम्मद असलम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी कामकाज पाहिले.
महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन करुन ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.