रत्नागिरी (आरकेजी): कामबंद आंदोलनाच्या काळात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवून नवीन कामगारांना सेवामुक्त करण्याचा आदेश मध्यवर्ती कार्यालयाने दिला आहे. महामंडळाच्या शिष्ट व अपील कार्यपध्दतीचा अवलंब न करता प्रशासन परस्पर कारवाई करत असून ती नियमाबाह्य आहे. प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल न केल्यास एसटी कामगार संघटनेला पुन्हा आंदोलनाला छेडावे लागेल, असा सूचक इशारा कामगार संघटेनेने दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेपासून दोन दिवस गैरहजर राहत कामबंद आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान परिवहन मंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत कामगारांवर कारवाई न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी आश्वासन देवूनहि प्रशासन त्याची पायमल्ली करीत आहे. मध्यवर्ती कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना बंदमध्ये सहभागी असलेल्या नवीन कामगारांनाअनुकंपातत्वावर लागलेल्या कामगारांना सेवामुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे- एसटी प्रशासन आपल्या नियमांची पायमल्ली करत असून अनुचित प्रथा सुरु करत आहे. प्रशासनाच्या या भुमिकेमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. प्रशासन आपल्या भुमिकेवर ठाम राहिले तर एसटी कामगार संघटना न्यायालयात जाण्याबरोबर आंदोलनाची भुमिका स्विकारेल असा इशारा एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिला आहे.