रत्नागिरी (आरकेजी)- महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनाच कामगारांचे प्रश्न सोडवू शकते, असं म्हणत इतर एसटी कामगार संघटनांचा खरपूस समाचार महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी घेतला आहे. रत्नागिरी दौऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
एसटी कामगारांचे प्रश्न परिवहनमंत्री दिवाकर रावते सोडवत नाहीत. मान्यताप्राप्त आणि सेनेची संघटना काही काम करत नाही. काँग्रेस सत्तेवर असताना इंटक काही करू शकली नाही, आता सेना सत्तेवर असताना काय करणार? महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनाच कामगारांचे प्रश्न सोडवते. आम्ही प्रशासनाकडून प्रश्न सोडवून घेऊ आणि प्रसंगी खळ्ळऽखट्याक करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी यावेळी दिला.
दहा वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेची संघटना कार्यरत झाली. त्यानंतर हजारो कामगारांनी संघटनेत प्रवेश केला. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत मनसेच्या सभासदांची संख्या कमी झाली. या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे पुन्हा सक्रिय झाली आहे. त्याकरिता श्री. माळी यांनी रायगडपासून महाराष्ट्र दौर्याला सुरवात केली.
माळी यांनी पत्रकारांना सांगितले की, मी दत्ता सामंत यांच्यासोबत काम केले आहे. गिरणी कामगारांकरिता गेली 40 वर्षे झगडत आहे. अनेकदा तुरुंगवासही भोगला, लाठ्या खाल्ल्या. अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर मी दौरा सुरू केला आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आपल्या अडचणी मांडत आहेत. प्रसंगी आक्रमक झाले पाहिजे. दिवाकर रावते यांनी एसटीचे खासगीकरण सुरू केले आहे. पगारवाढीसाठी शिवसेनेचे एसटी कर्मचारी रावते यांच्याकडे गेले होते. तेव्हा रावते यांनी त्यांना तुम्ही कोर्टात जा, असे सांगितले. पगारवाढ करणे रावतेंना शक्य होते, मात्र ते मुद्दाम करत नाहीत. शिवसेनेला एसटी कामगारांविषयी काही देणे-घेणे नाही.
कामगारांच्या संपाविषयी माळी यांनी सांगितले की, कोणत्याही संघटनेने नव्हे तर सर्व कर्मचार्यांनी एकत्र येऊन संप यशस्वी केला. त्यामुळे त्याचे श्रेय कोणत्याही संघटनेने घेऊ नये. वडापमुळे एसटीचे नुकसान होत आहे. प्रत्येक एसटी स्टँडबाहेर असलेल्या वडाप वाहतुकीने एसटीचे कंबरडे मोडले आहे. आरटीओने कारवाई केली तर सर्व वडाप वाहतूक थांबू शकते. मात्र अर्थपूर्ण व्यवहारांमुळे वडाप वाहतूक फोफावत आहे. त्याला मंत्र्यांचा आशिर्वाद आहे, असा आरोपही माळी यांनी केला.