रत्नागिरी, प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत कोकण बोर्डाने सलग 11 वर्षे राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (99.27 टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (95.90 टक्के) आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 99.42 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.20 टक्के लागला असून, जिल्हा द्वितीय स्थानी आहे.
गतवर्षी कोकणबोर्डाचा 100 टक्के निकाल लागला होता. पण यावर्षी निकालात 0.73 टक्के इतकी किंचित घसरण झाली आहे. दरम्यान यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.
कोकण बोर्डाचा 99.27 टक्के निकाल
यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत उत्सुकता होती. विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता आला. राज्यातील 12,120 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
कोकण विभागातून एकूण 30 हजार 883 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 30 हजार 816 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 30 हजार 593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 टक्के एवढी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 20 हजार 762 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 20 हजार 705 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 20 हजार 540 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.20 टक्के एवढी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10 हजार 121 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 हजार 111 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 10 हजार 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 99.42 टक्के एवढी आहे.
कोकण विभागातून 720 पूनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यावर्षीही मुलींचीच बाजी…. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 0.45 टक्क्यांनी जास्त
रत्नागिरीत 10 हजार 540 मुलांपैकी 10425 मुले, 10 हजार 165 मुलींपैकी 10 हजार 115 मुली उत्तीर्ण झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 223 मुलांपैकी 5 हजार 189 मुले तर 4 हजार 888 मुलींपैकी 4 हजार 864 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 0.45 टक्क्यांनी जास्त आहे.
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार 20 जून ते शनिवार 9 जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.















