नवी दिल्ली : हरीत आणि शाश्वत विकासासाठी वर्तनात्मक बदल घडवण्याकरिता उद्योगजगत आणि समाजाला आत्मनियमनाचे आवाहन केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी केले आहे. “प्लॅस्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन- संधी आणि आव्हान” या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात ते आज नवी दिल्लीत बोलत होते.
शहरांचा विकास करतांना पर्यावरण रक्षणाचा दृष्टीकोन बाळगला पाहिजे. घरांसाठीच्या बांधकामात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले पर्यावरणस्नेही साहित्य आणि नवीन आणि पर्यायी बांधकाम तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यामुळे बांधकाम खर्च कमी होण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी राखण्यासाठी मदत होत असल्याचे ते म्हणाले. 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे कचरा व्यवस्थापनाप्रती जनजागृती झाली असून यामुळे देशाच्या अनेक शहरात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. भारतामध्ये कचरा व्यवस्थापन अद्यापही मोठ्या प्रमाणात पारंपारिक पद्धतीनेच केले जाते असे सांगून वैज्ञानिक पद्धतीने यावर प्रक्रिया करण्याची भारताची क्षमता भविष्यात वृद्धीगत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.