सिंधुदुर्गनगरी, 23 मे : राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून 1 हजार 545 मजूर व कामगार झारखंडकडे रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना फूड पॅकेट्स, पाणी बॉटल, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून मजूर व कामगार यांना एसटी बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील 237 मजूर 12 बसमधून, मालवण – 491, 25 बस, कुडाळ – 372, 22 बस, सावंतवाडी – 384, 19 बस, देवगड -37, 2 बस आणि वैभववाडी तालुक्यातील 24 जण 1 बस मधून असे एकूण 81 बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, यांच्यासह स्टेशन मास्तर वैभव दामले, संबंधित तालुक्यांचे तहसिलदार आदी उपस्थित होते.
रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पोलीस अधिकारी व 70 पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त साभाळला.