रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या विरोधात उद्या शुक्रवारी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार आहे.
राजापूर तालुक्यातील नाणारसह अन्य १४ गावांमध्ये होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला येथील स्थानिक जनतेचा विरोध असून स्थानिक जनतेबरोबर शिवसेना शेवटपर्यंत राहणार असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीन यापुर्वीच जाहीर केली असून स्थानिक आमदार या नात्याने मी पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेसोबत आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधात उद्या आझाद मैदान येथे प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने छेडलेल्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही शिवसैनिक खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त संख्येने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सहभागी होणार असून प्रकल्पविरोधी संघर्ष समितीकडून आपल्याला अधिकृत निमंत्रण देखील आले असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे.
रिफायनरी प्रकल्पाला आपला ठाम विरोध असल्याचे सांगत आमदार साळवी म्हणाले की, नुकत्याच प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर देखील मी स्वतः व जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाषजी देसाई यांनी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असल्याने प्रकल्प रद्द करावा अशी भूमिका मांडली होती. बैठकीमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे सन्माननीय सदस्य देखील उपस्थित होते. आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आमच्या भूमिकेचे प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने स्वागत केले असून संघर्ष समितीचा शिवसेनेवर ठाम विश्वास असल्याचे संघर्ष समितीकडून आपणास सांगितले आहे. तसेच यापुढे देखील भविष्यात ह्या प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पवरोधी संघर्ष समितीकडून ज्या ज्या वेळी ज्या ज्या प्रकारची आंदोलने, उपोषणे छेडण्यात येतील त्या सर्व आंदोलनात, उपोषणात शिवसेना पक्ष आणि स्थानिक आमदार ह्या नात्याने मी स्वतः तसेच खासदार विनायक राऊत व शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला पाठिंबा देतील, असे आमदार साळवी यांनी म्हटले आहे. प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोकजी वालम यांच्यासोबत आपली चर्चा झाली असून अशोक वालम यांनी भविष्यात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा उपोषणामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक हे निमंत्रीतच असतील व शिवसेनेला सोबत घेऊनच भविष्यात संघर्ष समिती प्रकल्पाच्या विरोधात लढा उभा करून शेवटपर्यंत लढेल असे सांगितल्याचे साळवी यांनी म्हटले आहे.
राजापूर तालुक्यातील मुंबईस्थि राजापूरवासिय तसेच कोकणातील मुंबईस्थित शिवसैनिकांनी ८ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करण्यास व सरकारला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडण्यात हातभार लावावा, असे जाहीर आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे.