
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार विनोद तावडे यांचे वादग्रस्त विधान
रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- शिक्षण खात्यातील अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याची धक्कादायक कबुली शिक्षण मंत्र्यांनी दिली. आॅफलाईन शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी मंत्रालय ते अधिकारी चिरिमिरी घेत असल्याने ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. रत्नागिरीत शिक्षणाची वारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून तावडे यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
राज्यातील १३१४ शाळा बंद करताना राज्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल, असा कोणताच निर्णय सरकारने घेतलेला नाही. अपवादात्मक स्थितीत असं कुठे झालं असेल तर पुन्हा तपासणी करून त्या बाबत निर्णय घेतला जाईल. पण शाळा बंद करण्याच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवली जात आहे, असं आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रत्नागिरी मध्ये स्पष्ट केलं आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षणाची वारी या शिक्षकांना प्रगत शिक्षण देणाऱ्या कार्य शाळेचे आयोजन रत्नागिरी मध्ये करण्यात आले होते. विविध सहा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक या शिक्षणाच्या वारीत सहभागी झाले आहेत. ही शिक्षणाची वारी तीन दिवस रत्नागिरी मध्ये चालणार आहे. राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शिक्षकांनी केलेल्या विविध शैक्षणिक प्रयोगाचे स्टोल इथे मांडण्यात आले आहेत. २० पट संख्येच्या खालच्या शाळा बंद करायच्या मागील सरकारच्या निर्णया मुळे २० हजार हुन अधिक शाळा बंद झाल्या असत्या आम्ही पूर्ण पहाणी करून मगच १३१४ शाळा बाबत निर्णय घेत असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
शिक्षकांना तावडेंच्या कानपिचक्या
रत्नागिरीत शिक्षणाची वारी कार्यक्रमात विनोद तावडे यांनी चक्क शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. राज्यातील सर्वात चर्चेत असलेला मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडे असल्याची कुबुली तावडे यांनी दिली. मात्र शिक्षणामधील वेगवेगळ्या निर्णयाने सर्वच शाळांमध्ये आपण चर्चेत असल्याची कबुली तावडे यांनी दिली. शाळा बंदच्या निर्णयाचे समर्थन तावडे यांनी केले. तर ८० टक्के शिक्षण खात्याच्या निर्णयाचे वास्तव शिक्षकांपर्यत पोहचलेच नसल्याची खंत त्यांनी शिक्षकांसमोरच व्यक्त केली.