मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासह शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीसंदर्भात निकष ठरविण्यासाठी ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ची विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत सोमवारी १९ जून रोजी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री-मंडळ उच्चाधिकार समितीची ११ जून रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतील प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे महसूल मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती येत्या सोमवार १९ जून पासून विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तथा शेतकरी प्रतिनिधींसमवेत थकित कर्जमाफी निकष ठरविण्यासाठी चर्चा करणार आहेत.
‘थकित कर्जमाफी निकष निर्धारण समिती’ ने १९ जून रोजी होणाऱ्या बैठकीस चर्चेसाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे संयोजक डॉ.अजित नवले, बँक कर्मचारी प्रतिनिधी विश्वास उटगी, शेतकरी प्रतिनिधी सर्वश्री धनंजय जाधव (पुणतांबे), संजय पाटील, बळीराम सोळंके (माजलगाव) यांना निमंत्रित केले आहे.