मुंबई : शासनाने जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून पाच वर्षात राज्यातील २५ हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.ॲक्सिस बँक फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘शाश्वत विकासाच्या ध्येयातील भागीदारी’ या विषयावरील तिसऱ्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे चेअरमन एस रामदोराई, बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शिखा शर्मा, माजी सीईओ सी बाबू जोसेफ आदी उपस्थित होते.संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाची १७ ध्येय निश्चित केली आहेत. शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचे जुने स्त्रोत पुनरुज्जीवित करण्याला प्राधान्य दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्यात आली आहेत. यावर्षी आणखी ५ हजार गावांची त्यात भर पडणार आहे. वेगवेगळे ट्रस्ट, संस्था-स्वयंसेवी-सामाजिक संस्था आणि लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविला जात असल्याने आता हा शासनाचा नाही तर लोकांचा कार्यक्रम झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात एक हजार गावांना स्मार्ट गावे करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या या एक हजार गावांच्या सोशल ट्रॉन्सफॉर्मेशनमध्ये कॉर्पोरेट्स, स्वयंसेवी संस्था आणि लोकांचा सहभाग घेतला गेला आहे. खाजगी क्षेत्राची नाविन्यशीलता, तंत्रज्ञानाची जोड शासकीय यंत्रणेला मिळाली तर हे काम दाेन ते तीन वर्षात पूर्णत्वाला जाऊ शकेल असेही ते म्हणाले.रोजगाराच्या क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, असंतुलित विकास, लिंगभेद, प्रगतीच्या दऱ्या या पर्यायी उत्पन्नाच्या साधनांच्या विकासातून साधता येणार आहेत. त्यासाठी अशी पर्यायी उत्पन्नाची साधने विकसित होणे गरजेचे आहे. काही जणांमध्ये समाजाला परत करण्याची क्षमता असते, परंतु त्यांच्याकडून फारसे योगदान होताना दिसत नाही. ॲक्सिस बँक फाऊंडेशनने एक दशलक्ष कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनामानात सुधारणा करण्याचा केलेला प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. ॲक्सिस बँक ही देशातील सर्वात जलद गतीने विकसित होणारी बँक आहेसामाजिक विकासाच्या त्यांच्या या कार्यात शासन कुठल्याही टप्प्यावर बँकेसोबत सहभागी होण्यास तयार असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी शाश्वत विकासाची १७ ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहनदेखील केले.