रत्नागिरी :- खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आज येथे केले.
“शासन आपल्या दारी” या अभियानानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.25 मे 2023 रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले, सर्वच नागरिकांना शासनाच्या संबंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही. अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा व जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी” ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ एकाच दिवशी विक्रमी संख्येने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार व स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत.
या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू,असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा पालकमंत्री महोदयांनी घेतला. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या तालुकानिहाय महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेवून या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट याची व्यवस्था याबाबतचा आढावा पालकमंत्री महोदय व जिल्हाधिकारी महोदयांनी घेतला. वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, नगरपालिका, परिवहन महामंडळ आदी विभांगाना सूचना देण्यात आल्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला मंत्रीमहोदयांनी दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दि.25 मे रोजी आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पालकमंत्री महोदयांना विभागनिहाय सविस्तर माहिती दिली.