मुंबई : शाहरुख खान यांच्यात भारताचे व्यक्तिमत्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. टी. सुब्बरामी रेड्डी फाऊंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने देण्यात येणारा राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्कार शनिवारी शाहरुख यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दहा लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
टी. सुब्बरामी रेड्डी, पामेला चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री रेखा, सिमी गरेवाल, जया प्रदा आणि पद्मिनी कोल्हापूरे, खासदार वेणुगोपाल धूत, अनु रंजन, शशी रंजन आदी उपस्थित होते.
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणांची ही ताकद राष्ट्र उभारणीसाठी आणि सकारात्मक कार्यात वापरायला हवी. स्वछ भारत, बेटी बचाव, कौशल्य विकास असे अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम सरकार राबवित आहे तरुणांनी त्यात सहभागी व्हावे. बॉलिवूडने तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे अशी अपेक्षा राज्यपाल राव यांनी व्यक्त केली.
शाहरुख खान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी आज जो कुणी आहे तो यश चोप्रा यांच्यामुळे आहे. यश चोप्रा यांच्यामुळेच माझे करिअर घडले. मी मुंबईत आलो तेव्हा मला कुटुंब नव्हतं पण आज माझे कुटुंब खूप मोठे आहे आणि ते जगभर पसरले आहे.
राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार लता मंगेशकर, अमिताभ बच्चन तसेच रेखा यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये पामेला चोप्रा, सिमी गरेवाल, बोनी कपूर,जया प्रदा आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा समावेश होता.