मुंबई : शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांमुळेच मुंबई शहर बकाल झाले. गेली २० वर्षे या पक्षांनी महापालिकेत कोट्यवधींचे घोटाळे आणि भ्रष्टाचार केले आणि मुंबईची इभ्रत चव्हाट्यावर आणली, असे आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, चरणसिंह सप्रा, पालिका विरोधीपक्षनेता प्रविण छेडा, माजी विरोधीपक्षनेते खान मोहमद बस्तीवाला यावेळी उपस्थित होते.
मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प ३८ हजार कोटींचा अाहे. देशातील काही राज्यांपेक्षाही तो अधिक आहे. असे असताना मुंबईच्या नागरी सुविधा सोडविण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, याकडे थरूर यांनी लक्ष वेधले. रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण आणि क्षेपणभूमी या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत कोणतेही लेखापरिक्षण झालेले नाही. मग पारदर्शक कारभाराचे सूत्र हेच का? असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला.
पेग्विंनसाठी ६५ कोटी खर्च केले गेले. एका पेग्विंनचा मृत्यू झाला. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २८ हजार रुपये खर्च केले. परंतु, अजूनही रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. गेल्या पाच वर्षात पालिकेच्या ३८ शाळा बंद झाल्या आहेत. ४० हजार विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत, अशी माहिती थरूर यांनी दिली. काँग्रेसला संधी द्या. मुंबईचा विकास होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना-भाजपाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडणार्या ’आरोपपत्र’ या पुस्तिकेचे प्रकाशन थरूर यांनी केले.
पालिकेतील भ्रष्टाचाराला भाजपाही जबाबदार – निरुपम
मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराला भाजपाही जबाबदार आहे. आणि हा पक्ष शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करण्याची भाषा करत आहे, ही मोठी थट्टाच आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. शिवसेना-भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे ते म्हणाले.
वाट लावली, सेना-भाजपाने मुंबईची वाट लावली… प्रचार गीत तयार
‘वाट लावली मुंबईची वाट लावली’, सेना- भाजपाने मुंबईची वाट लावली’ हे प्रचार गीत काँग्रेसने निवडणूक काळासाठी तयार केले आहे. या गीताची ध्वनीफित तयार आहे, त्याचा प्रचारासाठी वापर करणार असल्याचे निरुपम म्हणाले.