रत्नागिरी : शाळेचा पहिला दिवस म्हणजे आधी मुलांची रडारड भिती आणि पालक हैराण असं चित्र असायचं. पण मुलांची ही भीती आता जाऊ लागलीय. शिक्षकांच्या आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने मुलाना वाजत गाजत शाळेत आणण्यात आलं. आजपासून शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्यात.शाळेचा आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी अभ्यासाचा श्रीगणेशा करणाऱ्या मुलांचं जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मुलांचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केलेले पहायला मिळाले. रत्नागिरीतल्या नाचणे गावातल्या नारायणमळी शाळेतही आज पहिल्या दिवशी असं वाजत गाजत मुलांचं स्वागत करण्यात आलं. मराठी शाळेतल्या मुलांची पटसंख्या वाढावी, त्याना शिक्षणाची गोडी लागावी या हेतूने शिक्षक आणि ग्रामस्थानी केलेल्या या उपक्रमाला मुलांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी शिक्षक पालकांसह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आबा घोसाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ उपस्थित होते. विशेष म्हणजे संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आज तेरा हजाराहून अधिक विद्यार्थि इयत्ता पहिलीत दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.शाळेत आलेल्या मुलांचे स्वागत वाजत गाजत झाले. शाळेत शिकण्यासाठी आलेल्या मुलांची गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. पहिल्या दिवशी शाळा पानाफुलांच्या तोरणांनी सुशोभित करून मुलांचे स्वागत करण्यात आले. तर पहिली ते आठवीत शिकणाऱ्या २२ हजार १०४ पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले