New Delhi : २६ ऑगस्ट रोजी सकाळी संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय संमेलनाला दिल्लीच्या सिंघू सीमेवर जोरदार सुरुवात झाली. आज ऐतिहासिक देशव्यापी किसान आंदोलनाला ९ महिने पूर्ण होत आहेत. हे संमेलन उद्या दुपारपर्यंत चालेल. देशभरातील सुमारे २५ राज्यांतून २००० हून अधिक शेतकरी स्त्री-पुरुष प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कामगार, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी, दलित, आदिवासी संघटनांचे नेतेही सहभागी झाले आहेत. ह्या शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या सुमारे ६०० शेतकऱ्यांना भावपूर्ण आदरांजली वाहून संमेलनाची सुरुवात झाली.
राकेश टिकैत यांनी संमेलनाचे उदघाटन केले. आशिष मित्तल यांनी मुख्य ठराव मांडला. किसान सभेचे सरचिटणीस हनन मोल्ला, अतुल कुमार अंजान, राजाराम सिंह, दर्शन पाल, जोगिंदर सिंह उग्राहान, योगेंद्र यादव, मेधा पाटकर, शिवकुमार काक्का, जगजित सिंह दलेवाल, गुरनाम सिंह चढुनी इत्यादी किसान नेत्यांनी संमेलनाला संबोधित केले. उदघाटन सत्राच्या अध्यक्षमंडळात आणि या राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजन समितीत किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांचा समावेश आहे.
५ सप्टेंबरला ‘मिशन उत्तर प्रदेश-उत्तराखंड’चे उदघाटन करण्यासाठी मुझफ्फरनगर येथे लाखो शेतकऱ्यांची किसान महापंचायत जबरदस्त यशस्वी करणे, २५ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक देशभर अभूतपूर्व प्रमाणात यशस्वी करणे, आणि संयुक्त किसान मोर्चाचे चॅपटर्स प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात सुरू करून आणि या आंदोलनाला देशभर जोरदार चालना देऊन जनविरोधी व कॉर्पोरेटधार्जिण्या मोदी-शहा-प्रणित भाजप सरकारचा दारुण पराभव करणे ही बुलंद हाक या संमेलनाच्या ठरावात दिली आहे. त्यावर पुढील दोन दिवस चर्चा होऊन उद्या हा ठराव मंजूर होईल.
आज आणि उद्या या संमेलनात कामगार, शेतमजूर व दलित-आदिवासी, महिला, युवा- विद्यार्थी अशी विशेष सत्रे होणार आहेत. त्या सत्रांत इतर संघटनांच्या वक्त्यांसोबत सीटूच्या अध्यक्षा के. हेमलता, शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बी. वेंकट, जमसंच्या सरचिटणीस मरियम ढवळे आणि एसएफआयचे सरचिटणीस मयुख बिश्वास हे संबोधित करणार आहेत. किसान सभेसहित या सर्व संघटनांचे देशभरातील प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले आहेत.