
संस्कृती कलादर्पण गौरव रजनी महोत्सवाचा बिगुल वाजला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे सतरावे वर्ष आहे. या वर्षीच्या पुरस्कारांसाठी नाट्य विभागातून सर्वोत्कृष्ट सात नाटकांची निवड केली गेली आहे. साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन) या नाटकांचा यात समावेश आहे. एकूण २४ नाटकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. नाट्य परिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी स्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.
नाट्य महोत्सव ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे. पुरस्कारासाठी झालेल्या प्राथमिक निवड प्रक्रियेतील सात नाटकांपैकी यु टर्न २ आणि तीन पायांची शर्यत ही दोन नाटकं काही तांत्रिक कारणांमुळे नाट्यमहोत्सवात दाखवले जाणार नाही. या महोत्सवाच्या निमित्त रसिकांना कमी दरांत नाटकं पाहता येणार आहेत. चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर केली जातील , अशी माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली आहे.