रत्नागिरी (आरकेजी) : कालपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बावनदीला आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहुन गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये येथील रमेश लक्ष्मण गुरव (५५ / बोंड्ये गुरववाडी ) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. दुपारी त्यांचा मृतदेह वाहून गेल्या ठिकापासुन अर्धा किमी अंतरावर सापडला. या प्रकारामुळे तालुक्यात पावसाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. याबाबत त्याचा भाऊ रवींद्र गुरव याने पोलिस ठाण्यात कळवले. रमेश यांची बावनदीच्या किनारी बोंड्ये गावात शेती आहे. सकाळी ९ च्या सुमारास ते किनाऱ्याशेजारी काम करत होते. सकाळपासून परिसरात मुसळधार सुरु असल्यामुळे दरम्यान बावनदिला आलेल्या लोंढ्यात गुरव हे ओढले गेले आणि ते वाहून गेले. शेजारी शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून आरडा ओरड केली मात्र पाण्याच्या प्रवाहात ते गायब झाले. तातडीने ग्रामस्थांनी शोधकार्य सुरु केले. दुपारी २ च्या सुमारास गुरव यांचा मृतदेह ते वाहून गेलेल्या ठिकाणापासून ५०० मिटर अंतरावर सापडला.
संध्याकाळी देवरुख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रकाराने गुरव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.