रत्नागिरी, प्रतिनिधी : मान्सून सक्रीय झाल्यानंतरच्या पहिल्याच अमावास्येच्या उधाणाच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी भागात दाणादाण उडवून दिली आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच आज अमवास्येच्या उधाणाचं तांडव किनारपट्टी भागात पहायला मिळत आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत.हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केलं आहे. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. एकीकडे पावसाची बरसात तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळते.
गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. दरम्यान आज अमावस्या असल्याने समुद्राला उधाण आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात साडेतीन ते चार मिटर उंचीच्या लाटा उसळताना पहायला मिळत आहेत. आज आणि उद्या देेखिल अशाच पद्धतीच्या लाटांचं रौद्र रुप किनारपट्टी भागात जाणवणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सुचना दिल्या गेल्यात.















