
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : घाटकोपरमधील जांभळीपाडा येथील कैलास बाल मित्र मंडळातर्फे १६ व्या साई उत्सव वर्धापनदिनाच्या औचित्याने ७ ते ९ फेब्रुवारी असा तीन दिवसीय सोहळा नुकताच पार पडला.‘शिर्डी माझे पंढरपूर’ या संकल्पनेवर आधारीत प्रवेशद्वारावरील नयनरम्य सजावट नागरीकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. ज्यात विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले ह्या दृष्याचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता.
यंदाच्या उत्सवात साई सच्चरित्र पारायण, महिलांचा हळदी-कुंकू समारंभ, गजर साईनामाचा भजन कार्यक्रम, जागरण-गोंधळ, आरोग्य तपासणी शिबीर, भव्य पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले.
भव्य पालखी मिरवणूकीत घाटकोपरमध्ये प्रथमच वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीत जसा रिंगण सोहळा पार पडतो अगदी तसाच शेकडो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक आणि साईभक्तांच्या उपस्थितीत अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला ज्याची सर्वत्र चर्चा झाली.















