मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य सरकार व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे ३ हजार २३ कोटी १७ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता दिली. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांनाही यावेळी मान्यता देण्यात आली. हा महोत्सव जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी सर्व संबंधितांनी काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.
श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास दि. १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहे. या निमित्त संस्थानच्या वतीने दि. १ ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सदस्य भाऊसाहेब वाघचौरे, आमदार स्नेहलता कोल्हे, सचिन तांबे, प्रतापराव भोसले, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके पाटील, सल्लागार अनिल डिग्गीकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. जमादार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महोत्सवाच्या पूर्व तयारीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक विशेष सेल तयार करण्यात यावा. प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. महोत्सव काळात व इतर महत्वाच्या दिवशी गर्दीच्या वेळी स्वच्छता राहील, याची काळजी घेण्यात यावी. तसेच हा महोत्सव जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे. याशिवाय बाह्यवळण रस्त्याची कामेही तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा समिती तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. उपसमितीने महोत्सवाच्या पूर्व तयारीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता दिल्यानंतर आज कृती समितीपुढे हा आराखडा सादर करण्यात आला.
या आराखड्यानुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत एकूण ३ हजार २३ कोटी १७ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. त्याशिवाय, मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील संस्थानच्या मालकीच्या हरित पट्ट्यातील जमीन रहिवासी करणे, श्री साई प्रसादालय, साई आश्रम-२, स्टाफ क्वार्टर येथील इमारतीचे बांधकाम नियमित करणे,शेती महामंडळाची जमीन कायमस्वरुपी संस्थानला विकत देणे, विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये सुधारणा करणे आदींचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.