अलिबाग, 13 जुलै, 2021 : भारतातील सर्वात वेगाने वाढणार्या मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप्सपैकी एक असलेल्या रुनाया समुहाने, कोविड-19 संकटावर मात करण्यात महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होत, अलिबागमध्ये नुकतीच एक लसीकरण मोहीम राबविली.
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात, विशेषत: अलिबाग भागात, गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ही बाब लक्षात घेत, कंपनीने ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टशी करार करून नवेदार नवगाव या गावात सुमारे 500 नागरिकांना लसी देण्याची व्यवस्था केली. या उपक्रमामुळे येथील बहुतांश ग्रामस्थांना कोविड लसीचा पहिला डोस मिळू शकला. वेदांत समुहाचे उपाध्यक्ष नवीन अग्रवाल यांचे पुत्र आणि ‘रुनाया’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनन्य आगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाविषयी बोलताना अनन्य आगरवाल म्हणाले, “सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ‘रुनाया’तर्फे हे समाजहिताचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात या भागात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आम्ही येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा मला आनंद आहे. पुढील काही दिवसांत आम्ही आपल्या समाजाच्या हितासाठी अशा आणखी लसीकरण शिबिरांचे आयोजन करणार आहोत.”
सोमवारच्या लसीकरण मोहिमेत नवेदार नवगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शेखर बाली आणि नवेदार नवगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी पार्थना भोईर हे उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी, पार्थना भोईर यांच्या म्हणण्यानुसार, “प्रत्येकाला वेळेत लस दिल्याने, कोविड-19विरुद्धच्या लढ्यात विजय मिळविण्याची संधी उत्तम प्रकारे साधता येणार आहे. या मोहिमेतून आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे एक कृतीशील पाऊल उचलले गेले. त्याबद्दल आम्ही अनन्य आणि रुनाया समुहाचे आभारी आहोत.”
वेदांत समुहाचा एक महत्त्वपूर्ण भागीदार असलेला रुनाया समूह हा नैसर्गिक संसाधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतो. ही कंपनी शाश्वत व्यवसाय पद्धतींवर भर देते. स्थानिक समुदायांच्या उन्नतीसाठी व कल्याणासाठी तिने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
संसाधन क्षेत्राला अधिक टिकाऊ बनविण्यासाठी हा लसीकरणाचा उपक्रम राबविणारे अनन्य आगरवाल हे समाजात तळागाळात खेळांना प्रोत्साहन देण्याचे कामही उत्कटपणे करीत असतात. ‘वेदांत स्पोर्ट्स’चे अध्यक्ष या नात्याने त्यांचा भारतीय क्रीडा क्षेत्रास पुढे नेण्याचा मानस आहे. प्रत्येक मुलास खेळण्याची संधी मिळावी, कौशल्यवाढीच्या कार्यक्रमाबरोबरच त्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या अत्याधुनिक निवासी संस्था देशभरात उभारण्याची योजना त्यांनी आखली आहे.
‘रुनाया’विषयी :
नैसर्गिक संसाधने उद्योगात नाविन्यता, शाश्वतता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयोजित करणे हा ‘रुनाया’चा दृष्टीकोन आहे. नैवेद्य आणि अनन्य आगरवाल (वेदान्त लिमिटेडचे उपाध्यक्ष नवीन अग्रवाल यांचे पुत्र) यांनी ‘रुनाया’ची स्थापना केली. कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याची संकल्पना राबविण्यावर आणि त्यायोगे चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर या कंपनीचा प्रामुख्याने भर आहे. या संदर्भात प्रत्यक्ष सहाय्यभूत होणाऱ्या उत्पादनांच्या व्यतिरिक्त, अॅल्युमिनियम उद्योगासाठी शाश्वततेच्या उपाययोजना, किरकोळ धातूंची पुनर्प्राप्ती, ‘गॅस अॅटोमाईज्ड मेटलर्जीकल पावडर्स’ आणि टेलिकम्युनिकेशन केबल व पोलाद उद्योगासाठी अन्य अर्ध-तयार उत्पादने यांचाही ‘रुनाया’च्या पोर्टफोलिओमध्ये समावेश आहे.