
18 ते 44 वयोगटातील नागरीकांना कोविडचे लसीकरण चालू करण्यात येणार असून याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. एकूण 34 केंद्रांवर लसीकरण करण्याची यश फाउंडेशनने तयारी केली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या 18 प्राथमिक शाळांमध्ये लसीकरण करता येईल. रत्नागिरी शहरातील नगरपरिषद शाळांनुसार गाडीतळ, घाणेकर आळी, टिळक आळी, पर्याची आळी, तेली आळी, पाटीलवाडी, गोखले नाका, चवंडे वठार, घुडेवठार, खेडेकरवाडी, धनजीनाका, मांडवी, बंदररोड, खालची आळी, मुरुगवाडा, किल्ला, हनुमानवाडी, मिरकरवाडा, पोलिस हेडक्वार्टर, जुना माळनाका, विश्वनगर, अभ्युदयनगर, हिंदू कॉलनी, निवखोल, राजिवडा, कर्लारोड, आंबेशेत, मुरुगवाडा, पंधरामाड, चर्मालय, कोकणनगर, साळवी स्टॉप, क्रांतीनगर, कोकणनगर, पोलिसचौकी परिसर, हयातनगर, किर्तीनगर येथे लसीकरण केले जाईल. तसेच शहराजवळील जाकिमिर्या, शिरगाव, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, उद्यमनगर, मिरजोळे पाटीलवाडी, हनुमाननगर, खेडशी नाका, सेंट थॉमस स्कूल, कारवांचीवाडी, कुवारबाव उत्कर्षनगर, महालक्ष्मीनगर, नाचणे सह्याद्रीनगर, नाचणे क्र. 1, कर्ला, भाट्ये अशा 16 शाळांमध्ये लसीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
रत्नागिरी शहर आणि आसपासच्या गावातील शाळांमधील या एकूण 34 केंद्रामध्ये 18 ते 44 गटातील सुमारे एक लाख पात्र लोकसंख्या आहे. लसीकरणाचे हे शिवधनुष्य सरकारच्या मदतीने तीन महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रतिदिन 7 हजार लस पुरवाव्यात, अशी विनंती प्रस्तावात केली आहे. तसेच जिल्हा लसीकरण अधिकार्यांनी कोविन अॅप, पोर्टलवर या 34 केंद्रांची नोंदणी करून द्यावे. म्हणजे पात्र नागरिकांना तत्काळ नोंदणी करता येईल.
या केंद्रावर डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, कॉम्प्युटर ऑपरेटर, लसीकरण अधिकारी 2 अशी 7 जणांची टीम काम करेल. लस ठेवण्यासाठी लागणारा डिफ्रिजर, आयएलआर, व्हॅक्सिन कॅरीअर, बर्फ यांची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी परवानगी व प्रशिक्षण द्यावे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी खासगी केंद्र देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे लसीकरण यशस्वी करण्यासाठी तत्काळ परवानगी मिळावी, अशी मागणी दि यश फाउंडेशनने केली आहे.
या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंतिम वर्षाचे बेसीक बी. एस्सी नर्सिंग, जी. एन. एम. व ए. एन. एम. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व कर्मचार्यांना प्रशिक्षण द्यावे. त्यानुसार लसीकरण मोहिम 1 मेपासून पुढील 3 महिन्यांत पहिला व दुसरा डोस यशस्वीरीत्या पूर्ण करू. आरोग्य विभागाने किमान 2 प्रशिक्षित कर्मचारी द्यावेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. प्रतिदिन प्रति केंद्रावर 100 नागरीकांना लसीकरण होईल. त्याप्रमाणे संबंधित कर्मचार्यांचे नियोजन करून लसीकरण न थांबता नियमित सुरू राहील, याची दक्षता घेऊ, असे नर्सिंग कॉलेजने दिलेल्या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. लसीकरण मोहिमेमध्ये जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि यश फाऊंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचा संकल्प दि यश फाउंडेशनने केला आहे.