रत्नागिरी : रिफायनरीला विरोध किती आहे हे खरंच तुम्हाला पहायचं असेल, तर इथल्या 14 गावांमध्ये या, लोकांच्या घरामध्ये या, त्यांची मतं जाणून घ्या, पण दिशाभूल करणाऱ्या दलालांच्या फसव्या घोषणाबाजीला फसून जर रिफायनरी उभारण्याचं कटकारस्थान करत असाल तर ते कटकारस्थान उधळून लावण्याची ताकद आमच्या या एकजुटीत असल्याचा इशारा खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राजापूरमधल्या तारळ इथं निषेध सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
रिफायनरी विरोधकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. नुकत्याच पार पार पडलेल्या महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाणार रिफायनरी विरोधी समितीकडून रविवारी राजापूरमधल्या तारळ इथं निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारोंच्या संख्येने यावेळी लोकं उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, भाई सामंत यांच्यासह, अनेक गावांचे सरपंच, स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करणयात आला आणि पुन्हा एकदा रिफायनरी विरोधाचे ठराव आणि असहमतीपत्रे मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती काय हे दाखवून देण्यासाठी ही सभा आहे. भर उन्हात एवढी लोकं का एकत्र येताहेत, या जनतेच्या भावनांचा सन्मान मुख्यमंत्र्यांनी करावा, त्यांना फसवणाऱ्या टोळक्याला बळी न पडता प्रामाणिकपणे आक्रंदन करणाऱ्या या जनतेचा आवाज ऐकावा आणि त्यांना न्याय द्यावा हे आम्ही या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगत आहोत, आणि जर दलालांच्या घोषणाबाजीला फसून जर हा प्रकल्प इथल्या जनतेच्या माथी मारत असाल तर तो प्रयत्न उधळवून लावू असा इशारा खासदार विनायक राऊत यावेळी दिला..
कोकणच्या विकासासाठी हा प्रकल्प तुम्ही आणू इच्छिता, मग कोकणातले अनेक सिंचन प्रकल्प का बंद आहेत, बांबूला भाव नाही, आंब्याला हमी भाव नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पैसे नाहीत. कोकणच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना मंजूर करायच्या नाहीत पण दलालांचे खिशे भरण्यासाठी आणि सौदे अरेबियाच्या राजपुत्राचे बंगले उभे करण्यासाठी तो रिफायनरी प्रकल्प कोकणच्या भूमीवर आणताय तुमचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असंही राऊत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोधच. जो प्रकल्प भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, त्याची वाच्यता करणं, चर्चा करणं ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचं आमदार राजन साळवी यावेळी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुखानी या प्रकल्पाच्या बाबतीत जो निर्णय केलेला आहे, त्यामध्ये तसूभरही फरक पडणार नाही अशी ग्वाही साळवी यांनी दिली.
चर्चा करायचीच असेल तर मुख्यमंत्र्यांनी समर्थकांना घेऊन या 14 गावांमध्ये यावं आम्हीही त्यांच्याशी समोरासमोर चर्चेला करायला तयार असल्याचं भाई सामंत यावेळी म्हणाले.