
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच व्हावा, या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला भाजपनेही पाठींबा दर्शविला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांनीच ही माहिती दिली आहे. दरम्यान कोकण विकास समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या मोर्चाला विविध संघटनांचा पाठींबा मिळत असल्याचा दावा समितीतर्फे करण्यात येत आहे.
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून गेली तीन वर्ष जिल्हयातील राजकारण तापलं होतं. मात्र मार्चमध्ये या प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर वातावरण काहीसं शांत झालं होतं. मात्र प्रकल्प समर्थक आता आक्रमक झाले असून हा प्रकल्प इथेच व्हावा यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र प्रकल्प विरोधकांनीही याच दिवशी मोर्चाची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. जर आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने येऊन आंदोलन करू इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.
त्यातच भाजपने रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला पाठींबा दिला आहे. रत्नागिरीत वेगवेगळे उद्योग यावेत अशाच पद्धतीने आमची मागणी सातत्याने राहिली आहे. नाणार संदर्भात जे गैरसमज आहेत ते दूर करून जनतेच्या सहकार्याने नाणार प्रकल्प इथे व्हावा असं मुख्यमंत्र्यांनीही त्यावेळी म्हटलं होतं. आता जर यासाठी प्रयत्न होत असतील तर त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठींबा असल्याचं भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेत असलेला शिवसेना पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेसोबत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच मुद्द्यावर भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती. युती झाल्यानंतर काहिच दिवसांत या प्रकल्पाबाबतची अधिसूचनाही रद्द झाली. आजही शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात आहे. पण आता पुन्हा एकदा भाजपने रिफायनरी समर्थकांच्या सुरात सूर मिळवल्याने शिवसेना भाजपबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच शनिवारी होणाऱ्या रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला कितपत गर्दी होते, स्थानिक लोकं या मोर्चात किती सहभागी होतात, प्रकल्प विरोधक नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
















