
राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. अध्यादेशही रद्द करण्यात आलेला आहे. एकूणच हा प्रकल्प इथे होणार नाही हे नक्की आहे, त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे. जनतेला खोटी आश्वासनं देऊन, त्यांची फसवणूक करून त्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विनाकारण आपली शक्ती वाया जाऊ नये यासाठी आम्ही आजचा प्रतिमोर्चा रद्द केला. उद्या भविष्यात जर सरकारने हा प्रकल्प आणण्यासाठी हालचाली केल्या तर आम्ही आमची ताकद दाखवू आणि किती विरोध आहे हेही दाखवून देऊ. उलट आता आमचा विरोध पहिल्या पेक्षाही वाढला आहे. त्यामुळे आजच्या रत्नागिरीतल्या मोर्चाकडे आम्ही पाठ फिरवली आहे. आम्हाला असल्या दलाल व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अशोक वालम यांनी दिली आहे.