रत्नागिरी, प्रतिनिधी : आज मध्यरात्रीपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी आज एकच गर्दी केली होती. दूध, भाजीपाला, कांदा, किराणा खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती, मात्र जनतेला अवधी मिळावा यासाठी हा कडक लॉकडाऊन गुरुवारपासून असणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार सकाळी 7 ते 11 वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी असल्याने ग्राहकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. 3 जून पासून म्हणजेच आज मध्यरात्रीपासून याची कडक अंमलबजावणी होणार आहे. यापूर्वी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार 2 जून पासून हा कडक लॉकडाऊन सुरू होणार होता, मात्र नागरिकांना 48 तास आधी कल्पना द्यावी व त्यांना किराणा व अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी संधी मिळावी म्हणून गुरुवार दि. 3 जूनपासून कडक लॉकडाऊन होणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी संध्याकाळी स्पष्ट केलं.
या लॉकडाऊनमध्ये मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. तथापि, सदर आस्थापना मधून खादयपदार्थ, किराणा माल, वैदयकीय नसलेले साहित्य विक्री करण्यास परवानगी असणार नाही. याव्यतिरिक्त किराणा मालाच्या दुकानासह सर्व प्रकारचे दुकाने /आस्थापना पुर्णत: बंद राहतील. केवळ दुध विक्री घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत करता येईल.
त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारांत गर्दी केल्याचं चित्रं होतं. किराणा दुकानदारांसमोर खरेदीसाठी ग्राहक रांगेत उभे होते. मटण , चिकन विक्रेत्यांकडेही रांगा लागल्या होत्या. आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला, फळे नागरिक खरेदी करताना दिसत होते. सकाळी दुधासाठी विशेष मागणी होती. अनेक ग्राहकांनी जास्त दूध, दही खरेदी केले. त्यामुळे पहिल्या 2 तासांतच अनेक ठिकाणी दूध संपल्याचं चित्र होतं.