
प्रारुप विकास आराखड्याला मंजूरी
रत्नागिरी (आरकेजी) : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास मंगळवारी मंजूरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५६.९८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने समंती दिली. नियोजन समितीची बैठक अल्पबचत सभागृह येथे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गाभा क्षेत्रासाठी (कोअर सेक्टरसाठी) ९९ कोटी ४२ लाख रुपये तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ४९ कोटी ७१ लाख रुपये तसेच नाविण्यपूर्ण योजनेसाठी ७ कोटी ८४ लाख रुपये या निधीला मान्यता देण्यात आली. १५६ कोटी ९८ लाख नियतव्यापैकी ८७ कोटी ५५ लाख ७८ हजार रुपये वजा जाता ६९ कोटी ४२ लाख २२ हजार रुपये इतका नियतव्य इतर योजनांना प्रस्तावित करण्यात आलेला आहे. उर्वरित रुपये ६९ कोटी ४२ लाख २२ हजार या निधी मध्ये आरोग्य, शिक्षण, कृषि, दळणवळण इतर आवश्यक योजनांना निधी देण्यात आलेला आहे. सदर निधी मध्ये राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनुसूचीत जाती उपयोजनेचा सन २०१८-२०१९ चा वार्षिक आराखडा १७ कोटी ३२ लाख रुपयांचा असून आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांना सन २०१८-२०१९ च्या १ कोटी २८ लाख वार्षिक आराखडयास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.समितीच्या बैठकीमध्ये सन २०१७-१८ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये आतापर्यंत २५.४० टक्के निधी खर्च झालेला असून उर्वरित निधी या आर्थिक वर्षात खर्च होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बैठकीला उपस्थित होते.